मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले असताना आता राज्यातील ५ जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली असून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणूक न घेण्याची मागणी केली आहे. यावरूनच राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा भाजपला कळवळा कधीपासून यायला लागला असा सवाल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला केला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
भाजपची साथ सोडून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जाहीर सभेत देवेंद्र फडणवस यांनी त्रास दिला असल्याचे सांगितले आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचे नेतृत्व होते यामुळे रोहिणी खडसेंनी या ट्वीटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.