आगामी सरकार काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे : काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील पुढील सरकार काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीचेच असणार असून गोमंतकीय जनेतेने तशी संधी दिलेली आहे. राज्यात ज्या पद्धतीने मतदान झाले आहे ते पाहता केवळ भाजपला घरी पाठविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून येत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. भाजपला दहापेक्षा कमी जागा मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
काल मंगळवारी काँग्रेस पक्षाने सर्व उमेदवारांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश चोडणकर यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे सर्व उमेदवार तसेच गोवा फॉरवर्डचे उमेदवार उपस्थित होते. गोव्यातील जनता काँग्रेस पक्षाला आपला पक्ष मानीत असून विविध प्रकारचे बदल करावेत, अशा जनतेकडून सूचना येत आहेत. जनतेच्या सूचनांनुसार काँग्रेस पक्षाने अनेक बदल केले आहेत. युवा आणि नवे चेहरे उमेदवार म्हणून काँग्रेसने दिले त्यालाच जनतेने मान्यता दिली असल्याचे चोडणकर म्हणाले. जनतेने मोठय़ाप्रमाणात केलेल्या मतदानाबद्दल जनतेचे आम्ही आभारी आहोत, असेही चोडणकर म्हणाले.
गोमंतकीय जनतेला भाजपचा कंटाळा : कामत
दिगंबर कामत यांनी जनतेचे आभार मानताना म्हणाले की, पी. चिदंबरम यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अवघ्या पाच मिनिटाच्या आत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. मुख्यमंत्रीपदाच्या यादीत तुमचे नाव आहे काय, असा प्रश्न कामत यांना विचारला असता ते देवाला माहीत, असे कामत यांनी सांगितले. गोमंतकीय जनतेला भाजपचा कंटाळा आला होता. कुठल्याही परिस्थितीत भाजपला घरी पाठविण्याचे गोमंतकीय जनतेने ठरविले होते. त्यानुसारच जनतेने कौल दिला असल्याची चिन्हे दिसत असून गोव्याच्या विविध भागातून आम्हाला तसा मागोवा मिळत आहे, असेही कामत म्हणाले.
पूर्ण बहुमत लाभणार : दिनेश गुंडू राव
काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला पूर्ण बहुमत मिळणार, असे दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. मतदान झाल्यानंतर आम्ही सर्व्हे केला असून एकंदरित चित्र स्पष्ट होत आहे की, गोव्यात पुढील सरकार काँग्रेस- गोवा फॉरवर्ड युतीचेच असणार आहे, असेही गुंडू राव यांनी सांगताना गोव्यात प्रचारासाठी आलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे, काँग्रेस कार्यकर्त्यांचे तसेच गोमंतकीय जनतेचे आभार मानले.