माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका मोदी, शहा यांनी भाजपची बनविली जुमला पार्टी
प्रतिनिधी/ पणजी
अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील भारतीय जनता पक्ष वेगळा होता. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या पक्षाला भारतीय जुमला पार्टी केली. या पक्षाला मत देऊन ते बरबाद करू नका. त्यापेक्षा नोटा बटन दाबून निषेध व्यक्त करा. आता तृणमूल काँग्रेसच्या रुपाने गोमंतकीयांना पर्याय दिलेला आहे, असे माजी पेंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या पणजीतील मुख्यालयात काल मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपण भाजप का सोडला, त्याचा खुलासा केला. शंभर कौरवांची नावे विचारल्यास फक्त दुर्योधन व दुःशासन ही दोनच नावे आठवतात तसे भाजपच्या नेत्यांची नावे विचारल्यास नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोडल्यास आणखी कोणालाच पुढे यायला दिले जात नाही.
आताचा भाजप देश संपवेल
इतर कोणाला टीव्हीवर दिसण्यास व वृत्तपत्रात फोटा प्रसिद्ध करायलाही बंदी आहे. इतर कोणाच्याच मताचा सन्मान केला जात नाही. वाजेपयी यांच्या काळात भाजप आणि आताचा भाजप याच्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आताची भाजप देश संपवेल, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.
तृणमूलला मदत केली
जिथे आपल्याला किंमत नाही तिथे शहाण्या माणसांनी थांबू नये, असे सांगताना आपण भाजप सोडला पण दुसऱया कुठल्याच पक्षात जायचे नाही, असे ठरविले होते, पण गेल्यावर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट थोपण्यासाठी आपण तृणमूलमध्ये प्रवेश केला आणि तृणमूलला 200 आमदारांचा आकडा पार करण्यास मदत केली, असे ते म्हणाले.
जुमला करणाऱया व ढोंगी भाजपवाल्यांचा खरा चेहरा उघडा झाल्यावर जनतेने भाजप विरोधात मतदान केले. गोव्यातील भाजपही ढोंगी असून त्यांना थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
बंगालमध्ये हिंसाचार वाढलेला आहे. हिंदूंना घरात घुसून मारले जात आहे. असा हिंसाचार गोव्यात नको असेल तर तृणमूल काँग्रेसला मतदान करू नका, असा प्रचार केला जातो. यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता हा अपप्रचार असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करून मत मागण्याचा प्रकार चालू आहे. भाजप गोव्यात आणि केंद्रातही सपशेल नापास झाला आहे. आर्थिक स्थिती डबघाईला पोचली आहे. केंद्रातून आणि राज्यातून भाजपला संपवले पाहिजे, असे म्हणाले.
निवडणूक आयोगाकडून भेदभाव!
निवडणूक आयोग इतर पक्षांवर कारवाई करीत आहे. भाजपवर कारवाई केली जात नाही. त्यांनी आचार संहिता व कोविड प्रोटोकॉल मोडला तर चालतो इतर पक्षांना मात्र बळी बनवले जाते. या निवडणुकीत भाजपच्या समर्थनात सरकारी यंत्रणा राबविली जात आहे, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.