कोल्हापूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादावर भाजप निशाणा साधत आहे. पण आमच्या कुणाचं काय व्हावं? याची चिंता भाजपला का आहे? भाजपला शिवसेनेची चिंता का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत भाजपला टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारला असता, जरा शहाण्या माणसाला बद्दल विचारा, अशी खोचक प्रतिक्रिया पवार यांनी दिली. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा इतिहास तपासून घ्यावा. राष्ट्रवादीने नेहमी सर्व जातीतील लोकांना पुढे घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. नंतर टीका केली. आता पुन्हा कौतुक सुरू केले. आता अयोध्याला जाणार आहेत. त्यामुळे ते उद्या काय करतील? हे मला सांगता येणार नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाचा गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडू नये, अशी माझी भूमिका आहे. राजू शेट्टी आमच्यासोबत हवे आहेत. केंद्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांविरोधी आहे, अशा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत हवी. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
माझे आजोळचे लोक भूमिका घेतील
देशभर आपण शाहू महाराज यांचे नाव घेतो. त्यामुळे कोल्हापूरच्या पोटनिवडणूकित जातीयवाद निर्माण करणाऱ्या पक्षाला पंचगंगा नदीच्या जवळ येऊ देऊ नये. त्यांच्याविषयी माझ्या आजोळचे लोक याबाबत योग्य भूमिका घेतील, असे पवार म्हणाले.