प्रतिनिधी / सातारा :
गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये सुरु असलेले आरोपप्रत्यारोप अत्यंत खालच्या पातळीवरुन होत आहेत. भाजपाकडून पातळी सोडून आणि सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी त्याबाबत अधिक भाष्य करणे टाळले.
राज्यात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत विरुद्ध भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दररोज नवा एक घोटाळा दोघे एकमेकांचा काढून आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांची पातळीही घसरु लागली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आलेले असताना पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, भाजपा या विरोधी पक्षाकडून सुडाचे राजकरण होत आहे. पातळी सोडून ते चालले आहेत. त्यावर मला बोलयाचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री हे भेट घ्यायला आलेले आहेत. त्याबाबत काय असा प्रश्न पत्रकारांनी छेडला असता ते म्हणाले, त्यांची पहिली तर भेट होवू द्या. जी काय राजकीय चर्चा होईल त्यातून देशपातळीवर अंमलबजावणी होणार आहे, असे त्यांनी सुचक वक्तव्य तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत केले.