कोरोना लस भारतात अधिक वापरली असती तर दुसरी लाट आलीच नसती –
नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशभरात कोरोनाची आकडेवारी नव – नवे उच्चांक गाठत आहे. तर देशातील सर्वाधिक ९ प्रभावित जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. शुक्रवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीवरुन देशामध्ये करोनाबाधितांची एका दिवसात वाढलेली संख्या तब्बल ६२ हजारावर झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वाढ २०२१ मधील सर्वात अधिक ठरली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १९ लाखांहून अधिक झाल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये दुसरी लाट आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली, ही सारी स्थिती जणु शासन, नागरिक यांना विचार करायला भाग पाडणारी अशीच आहे. याच स्थितीत काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत कोरोना नियंत्रणासंदर्भात टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शामा मोहम्मद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “भारताने आपल्या देशातील नागरिकांना जेवढ्या कोरोनाच्या लसींचे डोस दिले नाहीत त्याहून अधिक डोस संयुक्त राष्ट्र संघास निर्यात केले आहेत. कोरोना लसींचे डोस निर्यात करण्याआधी भारतीयांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. परंतु, संयुक्त राष्ट्र संघास लस निर्यात केल्यामुळे सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, अशी टीका शामा मोहम्मद यांनी केली आहे.
देशात व महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र सरकारकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.