प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेले आमदार सध्या भवितव्याच्या चिंतेत आहेत. मतदारसंघातील विकासकामे आणि मतदारसंघातील तरुणांना नोकऱया मिळवून देता येईल हे उद्दिष्ठ ठेवून या आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता, मात्र सध्या विकाकामेही नाहीत आणि नोकऱयाही नाहीत, अशी अवस्था काही आमदारांची झाली आहे, मंत्रिपदे मिळविलेले आमदार वगळता बाकी सर्वांची व्यथा एकच आहे.
राज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे विकासकामासाठी निधी म्हणावा तसा उपलब्ध होत नाही. नोकऱया मिळविण्याचे उद्दिष्ठ साध्य होत नाही. मतदारसंघाचा विकास आणि युवकांना नोकऱया या विषयावर बोट ठेवून या आमदारांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली होती. काही आमदारांनी काँग्रेसला दोष देत सत्ताधारी भाजप व सरकार कसे चांगले आहे हे जाहीर सभा घेऊन सांगितले होते, मात्र आता नोकऱया आणि विकासाच्या मुद्दय़ावरून हे आमदार तोंडघशी पडले आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांना तोंड देणे या आमदारांना शक्य होत नाही. त्याचबरोबर भाजपात प्रवेश केला तरी भाजप कार्यकर्त्यांनी या आमदारांना जवळ केलेले नाही. या आमदारांच्या मतदारसंघामध्ये अजूनही भाजप व काँग्रेस हिच दरी कायम आहे.
पावसाळा, आचारसंहिता यामुळे वेळ वाया
पुढील विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. या दोन वर्षात जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे दोन ते अडिज महिन्याचा वेळ विकासकामांच्या दृष्टीने वाया जाणार आहेत. दोन पावसाळे म्हणजे किमान आठ महिन्यांचा कालावधी वाया जाईल. तर पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असेल. त्यामुळे विकासकामे कधी पूर्ण करणार आणि दिलेली आश्वासने कशी पूर्ण होतील याची चिंता या आमदारांना आहे. विरोधात असताना जो जोश या आमदारांमध्ये होता तो आता सत्ताधारी असूनही राहिलेला नाही. एका बाजूने दुखावलेले कार्यकर्ते व दुसऱया बाजूने सत्तेत असल्याची अडचण अशी अवस्था या आमदारांची बनली आहे.
मंत्रिपदे मिळालेल्यांना चांगले दिवस
काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या काँग्रेसच्या दहा आमदारांपैकी तिघांना मंत्रिपदे मिळाली तर उर्वरीत काही आमदारांना महामंडळे मिळाली. ज्यांना मंत्रिपदे मिळाली त्यांना सध्या चागंले दिवलस आले आहेत. बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री आहेत, तर फिलीप नेरी रॉड्रिग्स व जेनिफर मोन्सेरात यांना मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे भाजपात येऊन या आमदारांनी आपले भवितव्य सुरक्षित केले आहे, मात्र उर्वरीत आमदार महामंडळे व अन्य मंडळावर असूनही सध्या संघर्ष करीत आहेत. महामंडळापेक्षा या आमदारांना मतदारसंघाचा विकास व नोकऱया महत्त्वाच्या नाहीत.
उमेदवारी मिळणर काय ? ही मोठी चिंता
सत्ताधारी भाजपात प्रवेश केला असला तरी येत्या निवडणुकीला उमेदवारीचे काय हा प्रश्न सध्या काही आमदारांसमोर आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, बाबू कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स, बाबूश मोन्सेरात व जेनिफर मोन्सेरात यांना उमेदवारीची चिंता नाही. कारण भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत समाधानकारक आकडा मिळविण्यासाठी या आमदारांची गरज आहे. पण इतर आमदारांचे काय हा प्रश्न आहे. काही आमदारांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे सांभाव्य उमेदवार आहेत ते ते प्रभावीपणे काम करतात. त्याचबरोबर अशा मतदारसंघातील आमदारांना भवितव्यातील संघर्षाची चिंता वाटत आहे.
कोणती चूक केली हे आज उमगते
काँग्रेसला सोडून भाजपात दाखल झालेल्या एका आमदाराने खाजगीत बोलताना भवितव्याबाबत चिंता वाटत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. आपण व दक्षिण गोव्यातील अन्य एक आमदार सर्वांत शेवटी दहा जणांच्या गटात सहभागी झालो. मतदारसंघाचा विकास होईल, नोकऱया मिळतील हे उद्दिष्ठ ठेवूनच भाजपात प्रवेश केला होता, मात्र आज परिणाम उलटे झाले. उलट निवडणुकीतील भवितव्याची चिंता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आता आपली कोणती चूक झाली हे आता उमगल्याचे जाणवते.