रवी नाईक यांची माहिती
प्रतिनिधी /फोंडा
भाजपाने मागील दहा वर्षांत राज्यात केलेला विकास व केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पाहून गोव्यातील जनता पुन्हा एकदा भाजपालाच संधी देणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे किमान 27 आमदार विजयी होतील, असा दावा माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते रवी नाईक यांनी केला आहे. आपल्या उमेदवारीविषयी बोलताना, पक्ष ज्या मतदारसंघात उमेदवारी देईल, तेथून लढण्याची आपली तयारी आहे. आमदार म्हणून आपण पुन्हा निवडून आल्यावर फोंडा हा तिसरा जिल्हा बनावा याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
फोंडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच जनतेच्या प्रश्नांना महत्व दिले. केवळ आपल्या एकाच मतदारसंघाचा विचार न करता संपूर्ण फोंडा तालुक्यात विकासकामे राबविली. फोंडा शहरात सर्व साधनसुविधा उभारतानाच शिक्षण क्षेत्रावर अधिक भर दिला. प्रशासन लोकांच्या दारी पोचायचे असल्यास येणाऱया काळात फोंडा हा तिसरा जिल्हा होणे ही काळाची गरज आहे. तिसऱया जिल्हय़ामुळे फोंडय़ासह शेजारील धारबांदोडा व वाळपई या तालुक्यातील सामान्य जनतेला पणजी किंवा मडगाव शहराकडे न जाता फोंडय़ातच सर्व प्रशासकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. मुख्यमंत्र्यांकडे आपण हा विषय मांडला असून त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. जिल्हा मुख्यालयासाठी कुर्टी येथील कृषी विपणन मंडळाची जागाही देण्याची तयारी दाखविली आहे असे रवी नाईक यांनी सांगितले.
‘घर व मालकी हक्क’ हा निवडणूक जुमला
‘माझे घर, मालकी हक्क’ हा काही राजकीय पक्षांनी निवडणुकीवर डोळा ठेऊन चालविलेला निव्वळ प्रचार आहे. गोव्यात आधीच कूळ-मुंडकार कायदा अस्तित्वात असताना आणखी कुठल्याही योजनेची गरज नाही. गोव्यातील कष्टकरी समाजासाठी जर काही कराचेच असल्यास गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले घर व शेतजमीनी संबंधीचे प्रलंबित खटले झटपट निकाली काढणे गरजेचे आहे. कूळ मुंडकारांच्या प्रश्नावर आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलो. आज मतांसाठी काही लोक जमीन हक्काचा विषय पुढे करुन मतांची गणित बांधत आहेत. या पक्षांनी व आमदारांनी एवढी वर्षे हे प्रलंबित असलेले हे खटले निकाली लागण्यासाठी कोणते प्रयत्न केले, असा प्रश्नही रवी नाईक यांनी उपस्थित केला.