आमदार प्रसाद लाड यांचा आरोप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोकणच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गडकिल्ले, देवस्थाने, समुद्रकिनारे, जलवाहतूक, बंदर विकास याचा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी या घटकांना निधी देण्याची आवश्यकता होती. परंतु शिवसेनेच्या सरकारने यातील एकाही घटकाला निधी दिलेला नाही. जिल्हा रुग्णालयाची अवस्था आहेच. विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्या श्रेयवादामुळे भाजपा सरकारच्या कालावधीत आलेला निधी खर्च करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला.
रत्नागिरीत असलेल्या आमदार प्रसाद लाड यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील सचिन वाझे प्रकरणी शासनाच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतले आहेत. त्यावेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील विकासात्मक श्रेयवादावरही भाष्य केले. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी दहशतवादी कृत्य करीत असल्याचा जोरदार आरोप लाड यांनी केला आहे. सचिन वाझे मोठा गुन्हेगार आहे. त्याला सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनआयएने भक्कम पुरावे गोळा केल्यामुळे सरकार अडचणीत आले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तोंड काळे झालेले असल्याची टिकाही केली आहे.
राज्य सरकार सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. स्फोटकांमुळे एनआयएने या प्रकरणात लक्ष घालून तपास सुरु केला आहे. त्यामुळे सचिन वाझेसह राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर दबाव असल्याचा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ डीसीपी दर्जाचे 2 अधिकारी व अन्य कर्मचारी यांचाही समावेश आहे. लवकरच या प्रकरणाची पाळेमुळे उकरून संबधित गजाआड होतील, असे लाड यांनी सांगितले. सरकारने वाझे याच्यावर कारवाई करणे टाळल्याने राज्य सरकारची इज्जत गेली आहे. एक दोन अधिकाऱयांमुळे पोलीस दल बदनाम होते. यावर गृहमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम केलेले असल्याचाही आरोप आमदार लाड यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना नैतिक अधिकार राहिलेला नाही
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या प्रकरणात बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. काही वर्षापुर्वी शिवसेनेचा सचिन वाझे सेनेचा प्रवक्ता असताना आता सेनेची सत्ता येताच पुन्हा पोलीस दलात आला. वरिष्ठ अधिकाऱयांचे पद असताना तेथे सचिन वाझेची नियुक्ती झालीच कशी, असा सवाल करत एकाच रात्री कमिटी बसवून सकाळी सचिन वाझेला ऑर्डर मिळाली. यामध्ये कोणाचा हात आहे, हे राज्यातील जनतेला कळून चुकल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. सचिन वाझे गजाआड झाल्यामुळे मन्सुन हिरेन खून प्रकरणाला वाचा फुटणार असल्याचे सांगितले.