देशावर आणीबाणी लादण्याच्या कृतीचा करणार निषेध
प्रतिनिधी /पणजी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली तो दिवस ’काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाचे महामंत्री ऍड. नरेंद्र सावईकर, तसेच सोशल मीडियाचे समन्वयक रुपेश कामत यांचीही उपस्थिती होती. भाजपतर्फे दरवर्षी हा दिवस ’काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमत्त आज 25 जून रोजी व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रम होणार आहेत. सायं. 5.30 वा. माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे व्याख्यान विविध सामाजिक माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. कामत यांनी दिली.
ऍड. सावईकर यांनी आणीबाणीचा इतिहास, देशातील लोकांवर झालेले अन्याय, अत्याचार यांची माहिती दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या प्रथमच अपात्र ठरल्या आणि त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली. त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी देशावर आणीबाणी लादली. हा निर्णय घेताना त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता घेतली नाही. तसेच त्यासंबंधी अध्यादेश राष्ट्रपतींना पाठविला. आश्चर्यकारक बाब म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनीही असा मंत्रिमंडळ मान्यता नसलेल्या अध्यादेशावर सही करून त्यास मंजुरी दिली. अशाप्रकारे आणीबाणीच्या माध्यमातून या देशाचा गळा घोटण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. परिणामस्वरुप देशभरात सुमारे 3 लाख लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्याचबरोबर सरकारच्या विरोधात लिहित असल्याचा आरोप ठेवत सुमारे 250 ते 275 वरिष्ठ पत्रकारांनाही अटक करण्यात आली होती. गोव्यातही 58 जणांना अटक झाली होती व त्यांना सुमारे 19 महिने तुरुंगात राहावे लागले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.