आसाममधील प्रकार – निवडणूक आयोगाकडून चार अधिकारी निलंबित
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये दुसऱया टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे. मतदान पार पाडल्यानंतर एका बोलेरो गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाथकरकंडीचे भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार आहे. ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने चार अधिकाऱयांना निलंबित करण्याबरोबरच सदर बुथवर फेरनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱयांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेले ईव्हीएम मशीन सीलबंद होते. तरीही एलएसी-1 रतबाडी (एससी) येथील मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे.
आसाममध्ये गुरुवारी दुसऱया टप्प्यात 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 6 वाजता मतदान संपल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसह ईव्हीएम घेऊन अधिकारी मतदान केंद्रावरून निघाले होते. निवडणूक आयोगाची गाडी वाटेतच बंद पडली. त्यानंतर अधिकाऱयांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. त्यातून हा प्रकार घडल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. यासंबंधीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने तक्रारींवर कारवाई करण्याची तसेच सर्व पक्षाकडून ईव्हीएम मशीनची पुनर्तपासणी करणे आवश्यक आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
या घटनेवरून विरोधकांनी भाजपसह निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले आहे. विशेषतः निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या कारणावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत सदर मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप उमेदवाराची कबुली
पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांच्या वाहनाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राजकीय आकांड निर्माण झाल्यानंतर सदर वाहन आपल्या पत्नीचेच असल्याची कबुली पॉल यांनी दिली आहे.
आयोगाने मागवला सविस्तर अहवाल
ईव्हीएम प्रकरणी गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने चार अधिकाऱयांना निलंबित केले असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हा निवडणूक अधिकाऱयांना दिले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर निवडणूक आयोगाने प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये गाडीतील बिघाडाचे कारण पुढे केले आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱयांनी एका वाहनाची मदत घेतली. वाहनाच्या मालकाबद्दल कोणतीही चौकशी न करता ईव्हीएम आणि इतर साहित्यासह त्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसह भाजपा उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र, करीमगंजमधील या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.