वृत्तसंस्था / श्रीनगर :
उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्हय़ात दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री मोठा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि माजी जिल्हाप्रमुख शेख वसीम उर्फ वसीम बारी, त्यांचे बंधू उमर सुल्तान आणि वडिल बशीर शेख यांची गोळय़ा झाडून हत्या केली आहे. उमर हे भाजपच्या जिल्हा युवा शाखेचे सदस्य होते. तर त्यांचे वडिल बशीर शेख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहिले आहेत. सुरक्षा दलांनी पूर्ण परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. तर पोलिसांनी भाजप नेत्याच्या सुरक्षेत तैनात 10 पोलीस कर्मचाऱयांची चौकशी सुरू केली आहे.
शेख वसीम यांच्या हत्येची जबाबदारी अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीच्या खात्म्याला बुधवारी 4 वर्षे पूर्ण झाली. बुधवारी रात्री 8.50 च्या सुमारास दहशतवाद्यांनी मुस्लिमाबाद भागातील भाजप कार्यकर्त्याच्या घरात आणि दुकानावर हल्ला केला आहे.
भाजप नेत्याच्या घरानजीकच बांदीपोर पोलीस स्थानक आहे. दहशतवाद्यांनी दुकानाबाहेर उभे असलेल्या शेख वसीम, त्यांचे वडिल बशीर, भाऊ उमर यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस तसेच आरआरचे सैनिक घटनास्थळी पोहोचले. घटनेवेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या 10 जवानांचे पथक तेथे उपस्थित नव्हते.
तिरंगा असायचा सोबत
भाजप नेते शेख वसीम पक्के देशभक्त होते. वसीम अनेकदा तिरंग्यासह दिसून यायचे. शेख वसीम आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेकरता यापूर्वी आयटीबीपीच्या जवानांचे पथक तैनात होते. पण हे पथक सुमारे दीड महिन्यापूर्वी हटवून 12 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
ओमर यांच्याकडून निंदा
माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांमध्ये निंदा केली आहे. काश्मीरमध्ये मुख्य प्रवाहातील राजकारणाशी निगडित लोकांवर दहशतवादी हल्ले सुरूच राहणे अत्यंत दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.