132 जागा ठरविणार दोन्ही पक्षांचे भवितव्य
पश्चिम बंगालमध्ये तीन टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले असून त्यासंबंधात भाजप व तृणमूल या दोन्ही पक्षांनी त्यांचे अनुमान व्यक्त केले आहे. मात्र, यापुढचा चौथा, पाचवा आणि सहावा टप्पा या दोन्ही पक्षांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. या टप्प्यात पश्चिम बंगालचा कोलकाता आणि त्याला लागून असणारा शहरी भाग, तसेच उत्तर बंगालमधील 132 जागांवर मतदान होईल. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत या जागांपैकी भाजपला अवघी एक जागा मिळाली होती, तर तृणमूल काँगेसला 110 जागा मिळाल्या होता. डावे व काँगेसच्या आघाडीचाही काही भागांमध्ये प्रभाव राहिला होता.
6 एप्रिलला झालेल्या तिसऱया टप्प्यातील बहुतेक मतदारसंघांमध्ये 2016 मध्ये तृणमूल काँगेसचे वर्चस्व राहिले होते. या टप्प्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा नव्हती. तर 31 पैकी तृणमूलला 29 आणि डाव्यांना व काँगेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. तृणमूलला मतेही 50 टक्के होती. यावेळी मात्र एवढे यश या पक्षाला मिळेल का याबद्दल साशंकता आहे.
लोकसभा निवडणुकीत परिवर्तन
मागच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसला 211 जागा मिळाल्या होत्या. तथापि तीनच वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील चित्र बऱयाच प्रमाणात पालटले होते. विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा मिळविलेल्या भाजपने लोकसभेच्या 18 जागा मिळविताना 121 विधानसभा भागांमध्ये आघाडी मिळविलेली होती. तर तृणमूल काँगेसला लोकसभेच्या 22 जागा आणि 164 विधानसभा भागांमध्ये आघाडी होती. काँगेसला लोकसभेच्या 2 जागा आणि विधानसभेच्या 9 भागांमध्ये आघाडी आणि डाव्यांना एकही आघाडी नव्हती.
भाजपच्या आशा पल्लवित
पश्चिम बंगाल हे भाजपसाठी अत्यंत दुष्प्राप्य असे राज्य मानले जात होते. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे त्या पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत फारसा प्रयत्न न करताही 18 जागा आणि 40 टक्क्यांहून अधिक मते पदरी पडल्याने भाजपने या विधानसभा निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावणे स्वाभाविकच आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदाराच्या प्राथमिकता आणि मानसिकतेतही अंतर पडत असते याकडेही तज्ञांनी लक्ष वेधले आहे.
पुढील टप्पे महत्वाचे का ?
पुढील तीन टप्प्यांमध्ये असणाऱया 132 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीत 60 जागांवर आघाडी मिळालेली होती. तर तृणमूलला 64 तर काँगेसला आठ जागांवर आघाडी होती. याचाच अर्थ असा की लोकसभा निवडणुकीचा निकष लावल्यास पुढील तीन टप्प्यांमध्ये भाजप आणि तृणमूल जवळपास समान पातळीवर असल्याचे दिसते. या तीन टप्प्यांमध्ये दक्षिण, मध्य आणि उत्तर बंगालमध्ये मतदान होणार आहे. कूचबिहार, दार्जिलिंग, कोलकाता, हुगळीतील उरलेल्या जागा, दक्षिण चोवीस परगाणा जिल्हय़ातील उरलेल्या जागा अशा अनेक महत्वाच्या जिल्हय़ांमध्ये मतदान होणार आहे.
उत्तर बंगालमध्ये भाजपला आशा
उत्तर बंगालमध्ये वास्तविक भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघी एक जागा मिळाली होती. तथापि, लोकसभा निवडणुकीत या भागातील सर्व सात जागा या पक्षाने पटकाविल्या होत्या. तसेच या सात लोकसभा जागांमधल्या 48 विधानसभा जागांवर आघाडी घेतली होती. साहजिकच या भागाकडून या विधानसभा निवडणुकीही भाजपला चांगल्या यशाची अपेक्षा आहे.
दोन पक्षांचे भिन्न आधार
भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष आपल्या यशाच्या अपेक्षेसाठी दोन परस्परविरोध निकष आजमावत आहेत. भाजपच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीचा निकष महत्वाचा आहे, कारण त्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी उत्कृष्ट झाली होती. तर तृणमूल गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकषावर अवलंबून आहे. कारण, त्या निवडणुकीत त्याचे निर्विवाद वर्चस्व होते. आता मतदार कोणता निकष विचारात घेतात, लोकसभेचा की विधानसभेचा, से समजण्यासाठी 2 मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.