काँग्रेसकडून स्थापन संस्थांची कवडीमोल दरात विक्री
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी भाजप हा दडपशाही करणारा पक्ष असल्याचा आरोप केला आहे. महागाई गगनाला भिडत असताना सरकार भांडवलदारांच्या हितांचे रक्षण करत आहे. 14 हजार कोटी रुपयांचे ऊसाचे बिल अद्याप शेतकऱयांना देण्यात आलेले नाही. भाजप नेत्यांचे राजकारण स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यापुरीत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
वड्रा यांनी कुशीनगर जिल्हय़ातील तमकुहीराज मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अजय कुमार लल्लू यांच्या समर्थनार्थ प्रचारसभेला संबोधित केले. त्यानंतर देवरियाच्या रुद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार अखिलेश प्रताप सिंह यांच्या प्रचाराकरता रोड शो केला आहे. या रोड शोला काँग्रेस समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
काँग्रेसने निर्माण केलेल्या मोठय़ा संस्था भाजप सरकारने कवडीमोल दरात विकल्या आहेत. शेतकऱयांची कर्ज माफी न करता उद्योजकांचे कर्ज माफ करण्यात आले. सध्या भरती प्रक्रिया गुंतागुंतीची करण्यात आली आहे. नद्यांच्या काठांची होणारी धूप सुरूच असून लोकांना पुरेशी वीज पुरविली जात नाही. राज्य सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी काहीच केले नसल्याचा दावा प्रियंका यांनी केला आहे.
माझ्या कुटुंबाला दहशतवादी म्हटले जाते, घराणेशाहीचा आरोप केला जातो. परंतु आम्ही भाजपसोबत तडजोड करणार नाही तसेच त्याच्यासमोर झुकणार देखील नाही. उत्तरप्रदेशात सत्तेवर आल्यास काँग्रेस रोजगारासाठी तरुणाईला एक टक्के व्याजदराने 8 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना 10 हजार रुपयांचे मानधन देण्यात येईल. 40 टक्के महिलांना रोजगार मिळवून दिला जाणार आहे. शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यात येईल आणि भटक्या जनावरांच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्यात येईल. काँग्रेस जनतेला सरकारवर निर्भर नव्हे आत्मनिर्भर करणार असल्याचा दावा त्यांनी केला.