सत्तेचा अमरपट्टा कायमच कोणाकडे राहत नाही. कधी ना कधी तो उतरवून दुसऱयाच्या हाती द्यावा लागतो. लोकशाहीचे हे खरे वैशिष्टय़. मात्र जेवढा काळ मिळाली तेवढी जबाबदारी कुशलतेने पार पाडणे ही राज्यकर्त्यांची किंवा विरोधकांची तयारी असावी लागते तर लोक त्यांना पुन्हा संधी देतात. महाराष्ट्रातील सत्तेच्या सिंहासनावरून दूर केल्या गेलेल्या भाजपला वर्ष होत आले तरीही त्यांना विरोधी बाक काही आवडलेला नाही. या पक्षातील कोणी ना कोणी नेता सातत्याने राज्यातील विद्यमान सरकार कोसळणार आणि आम्ही सत्तेवर येणार असे सांगत असतो. त्यासाठी वारंवार तारखा जाहीर करून ती घोषणा हवेत विरायच्या आत दुसरा कोणी आणखी वेगळी तारीख जाहीर करतो. हा हास्यास्पद प्रकार वर्षभर सुरू आहे. त्यात 23 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खूप लगबगीने कारवाया करून महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट दूर केली. भल्या सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या भ्रष्टाचाराचे भांडवल करून फडणवीस मुख्यमंत्री बनले होते त्या अजित पवारांना शपथ दिली गेली. तो प्रयत्न सपशेल फसला. पाच दिवसांमध्ये अकल्पितपणे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणून ज्यांचे नावही चर्चेत नव्हते अशा व्यक्तीला तीन पक्षांचे सरकार चालवण्याची जबाबदारी घ्यावी लागली. कायम एकमेकांच्या समोर विरोधक बनून उभे राहिलेले एकत्र कसे नांदतील हा प्रश्न उभा राहणे स्वाभाविक होता. पण ते नांदू शकणार नाहीत आणि आम्ही हे सरकार अल्पावधीत पाडून टाकू असे वारंवार सांगून सांगून भाजप नेत्यांनी गेले बारा महिने स्वतःचे खूपच हसे करून घेतले. 23 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होताना त्या शपथविधीची जुनी छायाचित्रे राज्यभर सर्वत्र मिम्स बनवून थट्टेसाठी वापरली गेली. कारण भाजप नेत्यांना झालेली घाई. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे एक विचारी व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना इतर नेत्यांनी शांत राहणे गरजेचे होते. सभागृहात आणि रस्त्यावर त्यांना पुरेशी साथ न देणारे हे नेते, माध्यमांच्या कॅमेरासमोर मात्र सातत्याने तोंडाची वाफ घालवताना दिसतात. फडणवीस यांना तो काळ विसरून पुढे जायचे आहे. पण भाजपचे इतर नेते ती जुनी रेकॉर्ड लावून एक वर्षापूर्वीच्या स्मृती भोवती घुमत बसलेले आहेत. मग कोरोनाच्या संकट काळात हे नेते कुठे होते असा प्रश्न विचारावाच लागतो. जेव्हा जनतेला तुमची गरज होती तेव्हा स्वतःला जपत बसलेले नेते मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत अशी टीका करतात तेव्हा आपण कुठे होतो, काय करत होतो हे मात्र सांगत नाहीत. हे महाराष्ट्रापासून लपून राहिलेले नाही की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती कोरोनासारख्या गंभीर प्रसंगाला थेट सामोरे जाण्यासारखी नाही. त्यांच्यावर यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया लपून राहिलेल्या नाहीत. तरीही मुख्यमंत्री घरात बसून असतात अशा पद्धतीची मोहीम चालवणे आणि सातत्याने तशाच पद्धतीने बोलत राहणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. पण भाजपचे नेते ते सगळे विसरुन अशा पद्धतीची खालच्या पातळीवरील टीका करण्यात धन्यता मानतात. फडणवीस यांनी तशी टीका केली नाही. त्यांनी स्वतः लोकांना दिलासा देणारा दौरा सुरू केला. त्यापूर्वी शरद पवार हे एकमेव नेते महाराष्ट्रात फिरत होते. त्यानंतर कोकणातील वादळग्रस्तांना दिलासा देण्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेही स्वतः बाहेर पडले. नंतर त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी अवकाळीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी दौरा काढला. त्यापूर्वी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत विठ्ठलाच्या महापूजेला पोहोचले होते. नेत्यांनी बोलून जे घडवायचे नसते ते कृतीतून घडत असते हे महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना फडणवीस यांच्याकडून सुद्धा शिकता आले नाही हे त्यांचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. शिवसेना असो किंवा भाजप, यांना प्रदीर्घ काळ महाराष्ट्रात विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आताच्या सत्तातूर नेतृत्वाच्या आधीच्या पिढीने विरोधी बाकावरही आपले पुरेसे संख्याबळ नसताना महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाचा एक दबदबा आणि आदर्श निर्माण केला होता. आज 105 आमदार पाठीशी असताना महाराष्ट्रात आदर्श निर्माण होण्याऐवजी भाजप नेत्यांवर ‘मीम्स’ अधिक बनत आहेत. आपल्याला नको नको ती नावे पाडली अशा तक्रारी ते स्वत:हून करत आहेत. त्यांची बाजू कार्यकर्तेही घेत नाहीत याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. दोन्ही काँग्रेसमधून पक्षात आलेली गर्दी राखण्यासाठी सत्ता पाहिजे असा आग्रह आणि दबावापोटी काम करणारी मंडळी कधीही नेतृत्व करू शकत नाहीत. यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकणार नाही. राज्यातील अनेक भाजप नेत्यांनी तारखा देऊन झाल्या आता रावसाहेब दानवे आणि प्रवीण दरेकर यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांनंतर सत्तांतर होण्याचे स्वप्न दाखवले आहे. लोकांना अशा आशेवर ठेवून निराशेकडे ढकलून देणे हे नेतृत्वाचे काम असत नाही. महाराष्ट्र भाजपचे फडणवीस नेते आहेत की ह्या सामूहिक नेतृत्वाकडे पक्षाची जबाबदारी सोपवली आहे याचा खुलासा भाजपच्या वरि÷ नेत्यांनी केलेला बरा. भाजप महाराष्ट्रात पुन्हा कधी सत्तेवर येणार नाही आणि यायची हीच तेवढी संधी आहे असे समजून नेते का वागत आहेत? सत्तेचा अमरपट्टा कधीच कोणाकडे कायम राहत नाही हे काँग्रेसला हरवून दाखवलेल्या पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना बहुदा मान्य नसावे!
Previous Articleआपण सारेच अपराधी आहोत तिचे!
Next Article मागासवर्ग कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश हेगडे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.