मुख्यमंत्र्यांच्या उल्लेखाने राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे, औरंगाबाद/ प्रतिनिधी
आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले, तर भावी सहकारी, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपासंदर्भात केल्याने राजकीय वर्तुळात शुक्रवारी जोरदार हादरे बसले. त्याला जोडूनच `याबाबत येणारा काळच काय ते ठरवेल,’ असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केल्याने सेना व भाजपा पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला उधाण आले. भाजपाच्या नेत्यांनीही राजकारणात काही अशक्य नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा `भाव’बंध जुळण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱयावर असून, येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले. या कार्यक्रमाला भाजपचे ज्ये÷ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. या वेळी दानवे यांच्याकडे पाहत आमचे माजी सहकारी व भावी मित्र, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या.
पत्रकार परिषदेत आज-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी, या विधानामागचा नेमका अर्थ कसा लावायचा, असा सवाल पत्रकारांनी केला असता ` अर्थ तोच होता, आजी-माजी सहकारी तिथे होते आणि उद्या कोणी एकत्र आले, तर भावी होऊ शकतात. हे सगळे म्हणजे येणारा काळच काय ते ठरवेल,’ असे उत्तर त्यांनी दिले. गमती जमतीचा भाग सोडा. माझे मत प्रामाणिक आहे, राजकारण एका पातळीवर हवे. त्याला विकृत स्वरुप येता कामा नये. हल्ली विकृत स्वरुप येत आहे. ते थांबले पाहिजे. राज्यात महाविकास आघाडी, केंद्रात भाजप सरकार आहे. आपण या मातीतील आहोत. आपल्या पदांचा महाराष्ट्रासाठी काय उपयोग करता येईल, ते पाहावे, यासाठी मी बोललो, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी केली.
सेना–भाजपा एकत्र आल्यास आनंदच : दानवे
कार्यक्रमात बोलताना दानवे यांनीही मुख्यमंत्र्यांची री ओढली. हे दोन्ही पक्ष नैसर्गिक मित्र आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास राज्यातील मतदारांनाही आनंद होईल, अशी टिप्पणी दानवे यांनी केली.
..तर केंद्र व राज्यात समन्वय असेल : अब्दुल सत्तार
शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील तीन वर्षे मुख्यमंत्री राहिले, तर आम्ही युतीसाठी तयार आहोत. जर दोन्ही पक्ष एकत्र आले, तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगला समन्वय तयार होईल.
चंद्रकांतदादा तीनपैकी एका पक्षात
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, असे विधान केले होते. त्यावर बोलताना मला असे कानावर आले आहे, की आमच्या तीनपैकी एका पक्षात ते प्रवेश करणार आहेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना लगावला.
राजकारणात काहीही होऊ शकते : फडणवीस
दरम्यान, या विधानानंतर भाजपा वर्तुळातून राजकारणात काहीही होऊ शकते, अशा प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केले आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. मात्र, सध्यातरी भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे पाहत नसून आम्हाला एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावयाची आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी नोंदवली आहे.
भाजपने आमच्याबरोबर खुशाल यावे ः संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटल्यानंतर ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचे असेल त्यांनी खुशाल यावे अशी संजय राऊत यांनी विरोधकांना खुली ऑफर दिली आहे. आजी सहकारी व्हावे. जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका, असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना जोक करण्याची सवय ः नाना पटोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय आहे. भाजप सध्या तणावात आहे, म्हणून त्यांच्या समाधानासाठी मुख्यमंत्री बोलले असतील. ते कोणत्या अर्थाने बोलले हे फक्त मुख्यमंत्रीच सांगू शकतील. तसेच आम्ही सत्तेत बसताना आनंदाने आलोय असे नव्हे, तर केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे होते म्हणून आम्ही सत्तेत आहोत. आमची 2024 साठी तयारी सुरु आहे. त्यासाठी आमचे काम सुरु आहे.
राज्यात सत्तेत बदल होणार नाही ः बाळासाहेब थोरात
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. या सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पुढील तीन वर्षे ही महाविकास आघाडीचेच सरकार असेल. राज्याच्या सत्तेत कोणताही बदल होणार नाही, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य भाजप अंतर्गत नैराश्य आलेल्या लोकांबाबत आहे.
सरकार स्थापनेसाठी भाजपाने पुढाकार घ्यावा ः आठवले
शिवसेना आणि भाजपाने एकत्र यावे हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे. शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत राहून फायदा नाही. त्यांनी भाजपसोबत यावे असे आवाहन मी यापूर्वीही केले आहे. आता संकेत मिळत आहेत. तर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करावी.