‘समर्थ’च्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग समन्वयकपदी अतुल काळसेकर
प्रतिनिधी / कणकवली:
2024 मध्ये होणाऱया महाराष्ट्रातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपने ‘समर्थ बुथ अभियान’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केलेली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समर्थ बूथ अभियानाचे समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
6 जुलै ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणाऱया या अभियानात राज्यातील 93 हजार बुथची रचना पूर्ण किंवा पुनर्गठीत होणार आहे. प्रदेशने यासाठी पक्षातील अनुभवी आणि संघटन कौशल्य असलेल्या पदाधिकाऱयांना एकेका लोकसभेची जबाबदारी सोपविली आहे. जिह्यातील अनेक निवडणुकींचा अनुभव आणि संघटन कौशल्याची खुबी असलेल्या अतुल काळसेकर यांना या लोकसभेच्या सहाही विधानसभेतील 1935 बुथची रचना पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार जिह्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे.
येथे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नीतेश राणे, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, संघटन सरचिटणीस जयदेव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा बैठकीत तीनही विधानसभेतील बूथ रचना पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विविध जबाबदाऱया देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे बूथरचना संयोजक महेश सारंग यांच्यामार्फत शक्तीकेंद्र आणि बुथवरील बैठका सुरू झाल्या आहेत.
यावेळी निवडणूक लढवण्याची व जिंकण्याचीही संधी भाजपला आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशने मतदारसंघात भाजपची ताकद वाढलेली असून पूर्वीचा पारंपरिक भाजप मतदार आणि व राणेंसोबत भाजपच्या प्रवाहात सामील झालेले मतदार यांची संख्या सहज साडेचार लाखांपर्यंत जाते. जी विजयासाठी आवश्यक मानली जात आहे. यासाठी प्रत्येक बुथवरील पक्षाचे संघटन मजबूत करणे ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक बुथवर किमान 30 जणांची समिती गठीत करण्यात येणार असून त्यात युवा, महिला तसेच सर्व सामाजिक घटकांना सामावून घेण्यात येणार आहे.
या लोकसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग जिह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 916 बूथ तर रत्नागिरी जिह्यातील तीन मतदारसंघात 1019 बूथ आहेत. या बूथ रचनेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक समन्वयक नियुक्त केलेला असून खाली मंडलस्तर आणि शक्तीकेंद्र स्तरापर्यंत विस्तारक नेमलेले आहेत. या अभियानात केंद्रीयमंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव प्रमोद जठार, नीलेश राणे, जेष्ठ नेते बाळ माने, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन व लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिधी यांच्या सहभागाने लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर हे अभियान शंभर टक्के यशस्वी करणार असल्याची माहिती जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी दिली.
बूथ अध्यक्षांशी साधणार संवाद
दरम्यान, 17 सप्टेंबर या अभियान समाप्ती दिवस हा पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस असून यावेळी ते राज्यातील सुमारे 93 हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत.