ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
भाजप लढण्यासाठी स्वत:चे हत्यार वापरत नाही. ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवतात. ते खांदेही पिचलेले असतात. काही भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरुन आम्हाला विरोध केला जातो. त्यामुळे बॉम्ब फोडण्याची भाषा करणाऱ्यांची साधी लवंगीसुद्धा फुटत नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
राऊत यांनी आज औरंगाबादमध्ये महागाईविरोधात आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. त्यापार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या नेत्यांना नमविण्यासाठी विरोधक ईडी, सीबीआयची मदत घेतात. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही. मग काही राजकीय पक्ष भाडय़ाने घेऊन आम्हाला विरोध केला जातो. हत्ती चालत असतो. पाठीमागून कोण भुंकतोय याच्याकडे लक्ष्य देण्याची गरज नाही. जे आमच्यावर पाठीमागून वार करायला येत आहेत, त्यांनी मर्दासारखं समोर यावं. दुसऱ्यांचे खांदे आणि दुसऱ्यांच्या गंजलेल्या बंदूकांनी आमच्यावर हल्ले करू नये, असेही राऊत म्हणाले.
एसटी संपाबाबत बोलताना ते म्हणाले, भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकावत आहेत. संप चिघळवून त्यांना राजकीय लाभ घ्यायचा आहे. जमलं तर आम्ही या नेत्यांना नाटय़ पुरस्कार देऊ.