काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांचे मत
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील भाजप सरकारने गेल्या 10 वर्षात अल्पसंख्यकांकडे आणि प्रामुख्याने मुस्लीम समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून हाज हाऊस व अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यातही सरकारला अपयश आल्याची टीका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इमरान प्रतापगढी यांनी केली आहे.
पणजीतील केंग्रेस भवनात काल रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासह गोवा प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष नजीर खान यांनी सांगितले की मुस्लीम समाजाला गोव्यात अनेक समस्या भेडसावत असून त्याकडे गेल्या 10 वर्षात लक्ष देण्यात भाजप सरकारला वेळच मिळालेला नाही. हाज हाऊस – अल्पसंख्यांक अयोग या दोन प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता झालेली नाही. कबरस्तानचा विषयही रेंगाळत पडला असून तो देखील सोडवला जात नाही. त्यामुळे अल्पसंख्याक धाकात असून त्यांच्यात घबराट पसरल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भाजपने लोकशाही घटना संपवण्याचे सत्र चालू ठेवले असून गोव्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन इमरान व खान यांनी केले. गोव्यात या निवडणुकीत जनतेसमोर फक्त काँग्रेसचा पर्याय शिल्लक असून काँग्रेस पक्षाला मतदारांनी सत्तेवर आणून दुष्ट भाजपची राजवट संपुष्टात आणावी असेही ते म्हणाले. भाजपने अल्पसंख्यांकावर अन्याय केला असून त्यांना वेठीस धरल्याचे खान यांनी नमूद केले.