जनमत कौल दिनात विरोधकांची चौफेर टीका
प्रतिनिधी / मडगाव
राज्यातील भाजप सरकारला जनेतच्या भावनेची कदर नाही. हे सरकार जनहिताच्या विरोधात निर्णय घेत आहे. गोव्यात सद्या हुकूमशाही सुरू आहे. सर्व सामान्य जनतेवर अन्याय होत आहे. त्यामुळेचे सर्वांनी एकत्र येऊन भाजप सरकारला घरी पाठविण्याची वेळ आल्याची जोरदार टीका काल मडगावच्या लोहिया मैदानावर जनमत कौल दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘एक पावल एकचाराचे’ या जाहीर सभेतून करण्यात आली.
या जाहीर सभेत दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघातील लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यात शेळ-मेळावली येथून देखील आयआयटी प्रकल्प विरोधातील युवा नेते आवर्जुन उपस्थितीत होते. तसेच राजकीय नेत्यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते ऍड. सुरेल तिळवे तसेच बिगर सरकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
सुरवातीला जनमत कौलात योगदान दिलेले स्व. डॉ. जॅक सिकेरा यांचे नातू डॉ. सूजित सुखिजा, नात पावल सिकेरा पिंटो, स्व. शाबू देसाई यांचा मुलगा विशाल देसाई तसेच जनतमत कौलाचे साक्षीदार प्रा. हरिश्चद नागवेकर यांनी ‘ज्योत’ पेटवून या सभेची सुरवात केली.
गोंयकारपण हृदयात असण्याची गरज
यावेळी बोलताना प्रा. हरिश्चंद्र नागवेकर म्हणाले की, गोंयकार जनमत कौल दिनाची व्यवस्थितीत आठवण काढीत नव्हते. पण, या कार्यक्रमातून पुन्हा एकदा जनमत कौलाच्या आठवणी जागृत झालेल्या आहेत. आज सरकार चांगले काम करीत असले तरी गोंयकारपण हृदयात असण्याची गरज आहे. इयत्ता 4थी पर्यंत शिक्षणाचे माध्यम हे कोकणीतून व्हायला पाहिजे तर या ठिकाणी भिवपाची गरज नसेल. मराठी भाषेने देखील गोव्यात खुप चांगले काम केलेले आहे. तरी सुद्धा कोकणी व गोंव्याच्या प्रेमासाठीच आज लोक मोठय़ा संख्येने या ठिकाणी उपस्थितीत राहिले आहेत.
गोव्यासमोर आज पर्यावरण जतन करणे, स्थानिक युवकांना नोकऱया देणे तसेच गोव्याची अस्मिता जपण्याची आव्हाने असल्याचे उद्गार डॉ. सूजित सुखिजा यांनी काढले.
सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र यावे
सद्या भाजप सरकार जनतेच्या हिताआड अनेक प्रकल्प आणत आहे. त्याला जनता विरोध करीत आहे. पण, सरकार हे प्रकल्प जबरदस्तीने लादू पहात असल्याने हे सरकार जनतेच्या विरोधात काम करीत असल्याने आज सर्वजण एकत्र आलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्वांनी एकत्रितरित्या पुढे जाण्याची गरज आहे असे उद्गार सांगेचे आमदार प्रसाद गांवकर यांनी काढले. सांगेत जेव्हा आयआयटी प्रकल्प व्हावा, यासाठी आपण पुढाकार घेतला, त्यावेळी सरकारकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. उलट आपल्यावर सेटींगचा आरोप करण्यात आला. आत्ता आयआयटी कुठल्या मतदारसंघात नेली जाणार व कुणाबरोबर सरकार सेटींग करणार ते आपल्याला पहायचे आहे असे श्री. गांवकर यावेळी म्हणाले.
भाजपला घरी पाठविण्याची हीच वेळ
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळविला असला तरी तो विजय त्यांचा नव्हेच. कोरोना महामारीच्या भीतीने मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडले नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून आले. पण, जेव्हा पालिका निवडणूक व विधानसभा निवडणूक होईल तेव्हा मतदारमोठय़ा संख्येने बाहेर पडतील. तेव्हाच खरा निकाल कळेल. आज गोव्यात कोळसा, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, आयआयटी, वीज प्रकल्प यांना विरोध होत आहे. गोव्याच्या हिताआड कोणतेही प्रकल्प आल्यास त्याला असाच विरोध होईल. या विरोधातूनच भाजप सरकारला घरी पाठविण्याची वेळ आल्याचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले.
भाजपचे आम्हाला प्रेम नाहीच
महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे प्रेम नसल्याचे स्पष्ट आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्यामुळे आपल्याला टिकेला समोरे जावे लागत असल्याचे जुझे फिलीप डिसेझा यावेळी म्हणाले. वास्को शहरातील कोळशामुळे आपल्या भावाला कॅन्सर होऊन त्याचा बळी गेला. त्यामुळे आपण कधीही कोळशाचे समर्थन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुन्हा भाजपची संगत नको
गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकावर चौफेर टीका केली. सरकारने म्हादईला आई म्हणत तिला कर्नाटकला विकून टाकले, मेळावली वासियांना आयआयटी नको असताना आयआयटी आणली, आत्ता तर सरकार गांजाची शेती करू पहात आहे. मोलेत पर्यावरणाची हानी करून वीज प्रकल्प आणत आहे. कोळसा वाहतूक व रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यास विरोध असतानाही सरकार हे प्रकल्प पुढे नेत आहे. या सरकारला जनतेची कदर नाही.
पोलीस बळाचा वापर करून आज विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे सरकार पुढील निवडणुकीत सत्तेवर असणार नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. पोलिसांनी सरकारच्या तालावर नाचू नये असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभागणी होणार नाही, यासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच आपण या पुढे कधीच भाजपला साथ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुन्हा एकदा क्रांतीची वेळ आलीय
जनमत कौलच्या वेळी गोव्यात क्रांती झाली होती. गोव्याची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्यासाठी जनमत कौल घेण्यात आला. आज पुन्हा एकदा गोव्यात क्रांतीची वेळ आल्याचे उद्गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काढले. जनेतला नको असतानाही प्रकल्प आणणाऱया सरकारला विरोध विधानसभेत धारेवर धरणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. सरकारला गोव्याच्या हिताआड कोणतेच निर्णय घेऊ दिले जाणार नाही. त्यासाठी संघटितपणे काम केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.