भाजपचा पत्रकार परिषदेत दावा
प्रतिनिधी/ पणजी
आम्ही 22 प्लसचा संकल्प केला असला तरी राज्यातील लोकांचा एकूण कल पाहता आम्ही त्यापेक्षा अधिक जागा जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गत दहा वर्षात झालेली विकासकामे पाहता राज्याचा विकास भाजपाच करू शकतो हे सिद्ध झाले असल्याने गोमंतकीय जनतेने सद्सदविवेक बुद्धी वापरून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य विधानसभा निवडणुक एक दिवसावर येऊन ठेपली असताना शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आदींची उपस्थिती होती.
प्रचारसभांचा भाजपला चांगला लाभ होणार
यावेळी तानावडे यांनी सांगितले की पक्षातर्फे आतापर्यंत झालेल्या प्रचारसभा, अन्य कार्यक्रम तसेच त्यानिमित्त गोव्यात भेट दिलेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, मंत्री स्मृती इराणी, यांचा त्यात समावेश होता. या सभांचा भाजपच्या मतांची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.
प्रसार माध्यमांचे मानले आभार
त्याशिवाय अन्य स्थानिक नेते, पदाधिकारी, सदस्य यांनीही अहोरात्र घेतलेल्या कष्टांची त्यांनी माहिती दिली. त्यासाठी त्या सर्वांसह विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रं प्रतिनिधी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
राज्याच्या विकासासाठी मतदान करावे
भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्य आणि जनतेचा केलेला विकास सर्वांसमोर आहे. त्यासाठी गोमंतकीय जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. त्यांच्या खोटय़ा आश्वासनांकडे लक्ष देऊ नये. राज्याच्या विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी लोकांनी भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन तानावडे यांनी केले.
काँग्रेसने गाठली प्रचाराची हीन पातळी ः सावंत
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काँग्रेस पक्षाने स्व. मनोहर पर्रीकर यांच्याविषयी हीन दर्जाचे वक्तव्य करून प्रचाराची खालची पातळी गाठली असल्याचा आरोप केला. अशाप्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा त्यांनी जोरदार निषेध केला. काँग्रेसला टीका करायचीच असेल तर त्यांनी आमच्यावर करावी. पक्षावर करावी. पण दिवंगत पर्रीकर यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यावर भाष्य करणे निषेधार्ह आहे. पर्रीकर यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाला माहीत आहे. तरीही सर्दिन यांच्यासारख्या नेत्याने त्यांच्याविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणे हीन दर्जाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेतला.