प्रतिनिधी / खानापूर
सध्या खानापूर तालुक्यात क्लोजडाऊन सुरू असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग उन्हाळय़ात मिरची व विविध भाजी पाल्याचे उत्पादन घेऊन चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. उत्पादित झालेला भाजीपाला, मिरची विकण्याची खानापूर, बेळगाव, धारवाड येथील बाजारावरच शेतकऱयांची मदार आहे. पण यावर्षी भाजीचे दर कमी झाल्याने कवडीमोल दराने भाजी विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकऱयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी हतबल बनले आहेत. भाजीपाल्याला कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणेदेखील अवघड बनले आहे. मागील वर्षीदेखील शेतकऱयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतामध्ये सध्या मिरची, कोबी, भेंडी, वांगी व इतर पालेभाज्या यासारखी पिके मोठय़ा प्रमाणात आहेत. परंतु पूर्णपणे क्लोजडाऊन असल्याने भाजीपाला विकावा कुठे, असा शेतकऱयांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाला, मिरची पिकविण्यासाठी केलेली गुंतवणूकदेखील निघणे अवघड झाले आहे. महागडी बियाणे, रासायनिक खतांचा वापर करुन पिके घेतली आहेत. परंतु बाजारात दर नसल्याने पिके कमी दराने विकावी लागत आहेत.
भाजी पीक घेण्यासाठी शेतकऱयांना बियाणे, रासायनिक खते, किटनाशक, मजूर, मशागत, यासाठी वारेमाप खर्च करावा लागतो. विक्रीसाठी नेताना पुन्हा मजुरी, वाहन भाडे, हमाली, दलाली असा भुर्दंड शेतकऱयांना सहन करावा लागतो. यातूनच शेतकऱयांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.