प्रतिनिधी/ बेळगाव
किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. वाढत्या उष्मामुळे हिरव्या पालेभाज्यांसह कलिंगड, लिंबू व फळांना मागणी वाढली आहे. गत आठवडय़ाच्या तुलनेत भाज्यांचे दर स्थिर असलेले पाहायला मिळतात. शिवाय काकडी व गाजरांना देखील मागणी वाढली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात लाल भाजी 10 रुपयला तीन, वांगी 10 किलो, मेथी 10 रुपयला दोन पेंढय़ा, शेपू 10 रुपयला दोन पेंढय़ा, फ्लॉवर 10 रुपयला एक, कोथिंबीर 10 रुपयला एक पेंढी, कांदापात 10 रुपयला चार पेंढय़ा, दोडकी 20 रुपये किलो, गवार 20 ते 25 रुपय किलो, ढबू मिरची 20 ते 25 रुपये, टोमॅटो 10 रुपय, कांदे 20 रु. किलो, लसूण 120 रु. किलो. आलं 80 रु. किलो गाजर 20 रु. किलो, काकडी 40 रु. किलो, लिंबू 20 रुपयाला 4 नग, शेवग्याच्या शेगा 10 रु. पाच नग, असा भाजीपाल्याचा दर आहे.
खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ
गेल्या सहा सात महिन्यात खाद्यतेलाचे दर वाढत चालले आहेत. तेलाच्या प्रति डब्यामागे 800 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे. पुन्हा शनिवारी खाद्यतेलाच्या दरात प्रति डब्यामागे 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले आहे. जिमिनी तेल डबा 2750 रुपये, फॉर्चुन 2670 रुपये, हेल्थफिट 2710 रुपये, पापतेल 2150 रुपये तर सोयाबिन तेल डब्याचा दर 2250 वर पोहचला आहे. खाद्य तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्य गृहणींची फोडणी महागली आहे.
वाढत्या उन्हामुळे थंड पेयाबरोबर फळांनादेखील मागणी वाढली आहे. कलिंगड, लिंबू व द्राक्षांसह इतर फळांना पसंती दिली जात आहे. तसेच लिंबुच्या मागणी देखील वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबुचे दर वधारले आहेत. शिवाय बाजारात फळांचा राजा देखील दाखल झाल्याने ग्राहक आंबेदेखील खरेदी करताना दिसत आहेत. देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंब्याच्या प्रति बॉक्सची 1500 ते 1800 रुपये विक्री होत आहे.
एपीएमसी मार्केट यार्डमधून शहरात व भाजी मार्केटमध्ये भाजीचा पुरवठा होतो. मार्केट यार्डमध्ये होलसेल दरात भाजी विक्री होत असली तर भाजी मार्केटमध्ये भाजीचा दर 5-10 रुपय अधिक असतो. भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक होत असल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.