प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरल्याचे चित्र दिसून आले. मागील आठवडय़ाच्या तुलनेत दरात 10 टक्क्यांनी घसरण झाली असून भाजीपाला स्वस्तात उपलब्ध होत आहे. यामुळे महिलावर्गातून समाधान व्यक्त होत असून आर्थिक बजेट आवाक्यात आले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. टोमॅटोपासून कोंथिबिरीपर्यंतचे दर कमी असून सध्या मटार तेजीत असल्याचे दिसून येत आहे. बाजाराचा फेरफटका मारला असता सर्व भाजीपाला उपलब्ध झाला असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी मार्केटयार्ड येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरल्याचे दिसून आले. दहा किलोप्रमाणे-नवलकोल 150 रु., कोबी 100 ते 120 रु., दोडकी 200 ते 250 रु., कारली 180 ते 200 रु., टोमॅटो 200 रु., गवार 200 रु., भेंडी 350 रु., वांगी 350 ते 400 रु., मिरची 350 ते 360 रु., ढबू मिरची 350 रु. असा दर होता. सध्या मटार तेजीत असून 500 ते 600 रु. दहा किलो असा दर ठरविण्यात आला.
फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांच्या दरातही घसरण झाली असून स्थानिक भाजीपाला मोठय़ा प्रमाणात दाखल होत असल्याने आवक वाढून दर कमी होत आहेत. पालेभाज्यांचा शेकडा दर विचारात घेतला असता मेथी 500 रु., कोथिंबिरी 600 रु., पालक 300 रु., शेपू 500 रु., कांदापात 450 रु. असा दर होता. यामुळे किरकोळ बाजारातही भाजीपाला स्वस्तात उपलब्ध होत आहे.