प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाल्याची आवक वाढली आणि दर कमी झाले, असे चित्र दोन आठवडय़ांपासून दिसून येत आहे. महिना अखेरच्या शनिवारच्या आठवडी बाजारातही आवक वाढल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. यामुळे महागाईचा सामना करणाऱया सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाल्याची स्वस्ताई अनुभवायला मिळत आहे. फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली असून यामुळे टोमॅटोपासून मेथीपर्यंतच्या भाज्या चवीने चाखता येणार आहेत. स्थानिक भाजीपाला दाखल होऊ लागला असल्याने आवक वाढली असून यामुळे मार्केडयार्डमधील भाजीमार्केटमध्ये दर कमी झाले आहेत. यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून कमी दरात भाजीपाल्याची विक्री होत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात मार्केडयार्ड येथील दर दहा किलोला 200 ते 250 रुपयांवर स्थिरावले आहेत. 50 ते 60 रु. किलो असणाऱया फळभाज्या 25 ते 30 रु. किलो झाल्या आहेत. कोबी 120 ते 140 रु. 10 किलो, दोडकी 250 ते 300 रु., कारली 250 रु., टोमॅटो 200 रु. दहा किलो, गवार 200 ते 250 रु., भेंडी 300 ते 350 रु., मटार 500 ते 600 रु., मिरची 300 रु. असे दर आहेत. 40 ते 50 रु. नग असणारा फ्लॉवरचा दरही घसरला असून 200 रु. डझन फ्लॉवर आहे. वांगी 400 रु. दहा किलो आहे. सध्या नुकतेच दाखल होत असणाऱया मटाराचा दर अधिक असल्याचे मत व्यापारीवर्गातून व्यक्त करण्यात आले.
हिरव्यागार भाज्याच भाज्या
पालेभाज्यांचे दर कमी झाले असून सध्या बाजारात सर्वत्र हिरव्यागार भाज्याच भाज्या असे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे 20 ते 25 रु. जुडी असणाऱया पालेभाज्यांचे दर 5 रु. जुडीवर येऊन थांबले आहेत. शेकडा पालेभाज्यांचे दर विचारात घेता मेथी 500 रु. शेकडा, पालक 300 रु., लाल भाजी 400 रु., कांदा पात 400 रु., कोथिंबीर 400 रु. असे पालेभाज्यांचे दर आहेत. यामुळे महिन्यापूर्वीपासून असणाऱया आहारातील कडधान्यांचे स्थान आता पालेभाज्यांनी घेतले आहे.