प्रतिनिधी / बेळगाव
भाजीपाल्याच्या दराने महागाईचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. मात्र थंडीची चाहूल आणि भाजीपाल्याची वाढती आवक यामुळे भाजीपाला स्वस्त झाला असून वाढत्या दराने बाजारपेठेतून गायब झालेल्या भाजीपाल्याने पुन्हा एकदा स्थान मिळविले आहे. पालेभाज्याबरोंबरच फळभाज्या देखील स्वस्तच स्वस्त असून यामुळे समाधान व्यक्त होत आहे. शनिवारच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे चित्र दिसून आले असून चाळीशी पार झालेल्या टोमॅटो किरकोळ बाजारात 20 रु. किलो झाला आहे. यामुळे भाजीपाल्याचे गणित सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शनिवारी बेळगाव भाजीबाजारात दराचा आढावा घेतला असता गुरुवारपासून दर कमी होत चालला असल्याचे मत भाजीविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढल्याने व्यवसाय करणे कठीण बनले होते. मात्र सध्या भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दर कमी झाले आहेत. यामुळे बाजारात भाजीपाला मोठया प्रमाणात उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना देखील यामुळे दिलासा मिळाला आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्याने आहारातून भाज्या गायब झाल्या होत्या याची जागा प्रामुख्याने कडधान्य, डाळींनी घेतली होती. कोंथिबिरीपासून मिरच्यांपर्यंतच्या किंमती चढयाच होत्या. मात्र आता कोंथिबिरी 10 रु. ला 3 ते 4 जुडया तर मिरची 25 ते 30 रु. किलो झाल्या आहेत.
पालेभाज्यांचे दर उत्तरले.
मागील आठवडयात 15 ते 20 रु. असणारी मेथीची जुडी 10 रु. दोन अशा दरात उपलब्ध असून होलसेल बाजारात मेथीचे दर शेकडयाला 400 ते 500 रु.पये असल्याचे दिसून आले. दर पालक 10 रु. 3 जुडी, लालभाजी 10 रु. दोन जुडी, कांदापात 20 रु. 5ते 6 जुडया, शेपू 10 रु. 2 असा दर आहे. सणासुदीत देखील भाजीपाल्याचे दर अधिक हेते. मात्र दिवाळी होताच शेतातून भाजीमार्केट मध्ये येणाऱया भाज्यांची आवक वाढली आहे. यामुळे पालेभाज्या अगदी कमी दरात मिळत आहेत.
सर्वत्र भाजीच भाजी
मागील महिनाभरात भाजीपाल्याला चांगले दिवस आले होते. प्रत्येक भाजीची किंमत खरेदी करणाऱया ग्राहकांपासून विक्रेत्यापर्यतच सर्वांनाच होती. यामुळे भाजीपेक्षा बाजारात फळेच अधिक दिसत होती. मात्र सध्या हे चित्र बदलले असून सर्वत्र भाजीच भाजी दिसून येत आहे. फ्लॉवर 15 ते 20 रु. नग, मूळा 20 रु. 5 ते 6, कोबी 15 ते 20 रु. किलो, काकडी 10 रु. किलो, वाळकं 30 रु. किलो, नवलकोल 25 ते 30 रु. किलो, ढबु मिरची 30 रु. किलो, वांगी 20 ते 25 रु. किलो, कारली 20 ते 30 रु. किलो, भेंडी 40 ते 45 रु. किलो, बिन्स 40 ते 50 रु. किलो असे दर आठवडी बाजारात दिसून आली. यामुळे पन्नाशी शंभरी गाठलेला भाजीपाला आवाक्यात आल्याने खरेदी देखील जोरात सुरु असल्याचे दिसून आले.
वाटाण्याच्या शेंगा आणि हरभरा दाखल
आठवडी बाजारात थंडीच्या चाहूल लागताच वाटाण्याच्या शेंगा व ओला हरभरा दाखल झाला आहे. नुकत्याच दाखल झालेल्या या भाज्यांनी भाव खाल्ला असून मटार, वाटाण आणि ओला हरभऱयाचे दर अधिक आहेत. वाटाणा वाटाण्याचा दर 160 ते 200 रु. किलो असून ओला हरभरा 50 ते 60 किलो आहे. यामुळे या नवीन भाज्यांची चव चाखण्यासाठी पावकिलो का होईना महिला वर्गाकडून हमखास याची खरेदी केली जात आहे.