प्रतिनिधी / शिराळा
भाटशिरगाव ता.शिराळा येथील अर्जुन लक्ष्मण देसाई (वय ५३ ) व सुमन अर्जुन देसाई ( वय -४६) या पती-पत्नीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नातवासाठी आज्जी आणि आजोबा मासे धरण्यासाठी गेले असताना हा अपघात घडला आहे. मृत अर्जून देसाई यांचे चुलत भाऊ सुभाष राजाराम देसाई यांनी शिराळा पोलिसात याबद्दल वर्दी दिली आहे.
शिराळा पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अर्जून देसाई आणि त्यांची पत्नी सूमन हे दोघे तलावाजवळ असणा-या त्यांच्या शेतात गेले होते. शेतातील काम झाल्यावर त्यांनी नातवासाठी मासे धरण्यासाठी पाझर तलावात गेले.
मासे पकडण्यासाठी काठावर असताना सुमन देसाई यांचा अचानक पाय घसल्याने त्या पाण्यात पडल्या. यावेळी तलावाच्या दुसऱ्या काठावर असलेल्या अर्जून देसाई यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.पण सुमन यांनी गळ्याला मिठी मारल्यामुळे दोघांनाही बाहेर येता आले नाही. यातच दोघांचाही बुडून मृत्यु झाला. ही घटना जवळच असणाऱ्या त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाने बघितली आणि त्याने ही माहिती जवळच शेतात असलेल्या आपल्या आईला सांगितली. घटनेबद्दल माहिती मिळताच गावातील लोकांनी तलावात शोधाशोध सुरू केली.यामध्ये रंजीत देसाई, सर्जेराव घोलप,पिंटू अस्वले, शहाजी देसाई यांनी बोराटीच्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. अधिक तपास पोलीस हवलदार एस. एस. नलवडे करत आहेत.