प्रतिनिधी/ रत्नागिरी
समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे रत्नागिरी शहरानजीकच्या भाटय़े किनारी असलेल्या रत्नसागर बीच रिसॉर्टच्या 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. समुद्राची भरतीचे पाणी सुमारे 3 मीटर आत किनाऱयावर घुसल्याने येथील अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली आहे.
भाटय़े किनाऱयावरच झरीविनायक मंदिराच्या बाजूला रत्नसागर बीच रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. या रिसॉर्टच्या आवारात नारळासह विविध झाडे लावण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत समुद्राला मोठे उधाण आले होते. त्यामुळे भाटय़े किनाऱयावरील वाळूची मोठी धूप झाली. उसळलेल्या समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसल्या होत्या. त्यामुळे किनाऱयापासून आत 3 मीटरपर्यंतची वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून गेली. वाळूची धूप झाल्याने भरतीच्या लाटा वाढू लागल्यानंतर एक-एक नारळाची झाडे कोसळून पडली. येथील एकापाठोपाठ एक सुमारे 35 नारळाची झाडे पडली.
तर येथील काही झाडे वाकली असून ती केव्हाही कोसळतील, अशी परिस्थिती आहे. सुमारे 40 झाडांना भविष्यात धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या लाटांचे तांडव पाहून या रिसॉर्टमधील कर्मचाऱयांचीही घाबरगुंडी उडाली होती. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, एका झाडाचे नुकसान किमान अडीच हजार रुपये आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचा मिळून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा फटका बसला आहे.
पूर्वी भाटय़ेकिनारी रिसॉर्टच्या अर्धा किलोमीटर भागामध्ये वाळूचा नैसर्गिक बंधारा होता. तो सुमारे 3 फूट उंच होता. गतवर्षीही भाटय़ेतील काही सुरूची झाडे, स्मशानभूमीचा भाग आणि किनाऱयावरील वॉच टॉवरचा भाग वाहून गेला होता. यंदा दिशा बदलली. झरीविनायक मंदिराकडील भागात लाटांचा अधिक जोर होता. अजून अमावास्या आणि पौर्णिमेची भरती येणार असल्याने उधाणाचे संकट कायम राहणार आहे.