प्रतिनिधी/ लांजा
भात कापताना सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने भांबेड कोलेवाडीतील संजय दत्ताराम लांबोरे या 35 वर्षाच्या तरुणाचा गुरूवारी मृत्यू झाला. सुरूवातीला भांबेड ग्रामीण रुग्णालय तेथून लांजा सरकारी रुग्णालय आणि तिथेही आवश्यक उपचार न मिळाल्याने रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलला नेईपर्यंत तब्बल 10 तासांचा कालावधी लोटल्याने अत्यंत गरीब कुटुंबातील या तरुणाला आपला जीव गमवाला लागला.
गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी भात कापताना सायंकाळी 4.30 च्या सुमाराच या तरूणाला सर्पदंश झाला. त्याला तातडीने भांबेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र कोणतेही प्राथमिक उपचार न करता त्याला लांजा येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथेही या तरुणावर उपचार न करता त्याला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला देण्यात आला. संजयला प्रचंड त्रास होत होता. मात्र तरीही त्याला उपचार न मिळाल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तब्बल 3 तासानंतर राजापूरहून ऍम्ब्युलन्स आल्यानंतर त्याला रत्नागिरीला नेण्यात आले. त्यानंतर वाटेत संजय लांबोरेची प्रकृती खूपच बिघडली. त्याच्या पाठीतून प्रचंड कळा सुरू झाल्या. रत्नागिरीला मात्र त्याला आयसीयुमध्ये दाखल करून लगेच उपचार सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संजयचे उपचारादरम्यान रात्री 1.30 वाजता निधन झाले. हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत. या रुग्णालयातून त्या रुग्णालयात असे फिरवण्यात खूप वेळ गेल्याने या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचे त्याचे जवळचे नातेवाईक मनोहर लांबोरे यांनी सांगितले.
संजय यांना 2 लहान मुले आहेत. घरात दुसरे मोठे कोणीही कमवते नाही. भांबेड ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले असते तर या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे प्राण वाचले असते. या परिसरात यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात स्थानिक डॉक्टर उपलब्ध असण्यासाठी गावातील लोकांनी बऱयाच मागण्या केल्या. आमदार-खासदारांना लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करूनही आजतगायत डॉक्टर उपलब्ध नाहीत. संजयसारखे असे किती बळी गेल्यानंतर यंत्रणा जागी होईल, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत.