वार्ताहर/ काकती
काकती येथील कृषी रयत केंद्राच्या क्षेत्रात येणाऱया काकती, होनगा, गौंडवाड, बोडकेनट्टी, कडोली, हेंगेरी, कलखांब, अष्टे, हुदली परिसरातील भात पिकांवर विविध रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढला असून नियंत्रणाकरिता शेतकरी औषध फवारणी करीत आहेत. मात्र तुडतुडय़ांनी पिकात दळे पडणे व लेंबे काळी-पांढरी पडून चिंब होत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. रासायनिक खतापेक्षा औषधी खर्चात पुन्हा वाढ झाली आहे.
यंदा सतत पाऊस असल्याने भात पिकांवर पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी किड दिसून येत होती. भातपीक फुलोऱयात असताना या रोग, किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱयांनी औषध फवारणी केली आहे. मात्र पिकांच्या खोडात पोखरून किड प्रवेश करीत असल्याने भात रोपाचा गाभा मरत असल्याने लोंबी पांढरी-करडी होत आहे. जागोजागी भात लोंबा पणज होत असल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. या किडीने सर्वत्र डोकेवर काढले असून भात पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तर जागोजागी पिकांत दळे पडून तुडतुडय़ांनी पीक नष्ट होत चालले आहे.
अगदी भातपीक फुलोऱयात आल्यापासून किडीने भात पिकांवर थैमान घातले आहे. भात पिकांची सर्वत्र वाढ चांगली झालेली असताना या किडीच्या पिकावरील प्रादुर्भावाने शेतकरी हैराण झाला आहे.
कष्ट उपसून मोठय़ा प्रयासाने भाताच्या पिकांची निगराणी केली असूनही या किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे. काकती रयत केंद्र परिसरात 5 हजार 700 हेक्टरात भातपीक असून संबंधित कृषी अधिकाऱयांनी या किड रोगामागील कारणे शोधून उपाय योजना आखली, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.