उदय सावंत/वाळपई
समाजातील शेतकऱयांची आवड-निवड लक्षात घेऊन त्यांच्या समस्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारची यंत्रे निर्माण करण्याची वेगळी अशी ओळख असणाऱया ब्रह्मकरमळी सत्तरी येथील ओंकार कृषी यंत्र यांच्यातर्फे भात वारवणी मशीन, शेंगा मळणी मशीन व हळद पॉलिश मशीन यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या यंत्राचे उद्घाटन नुकतेच व राज्याचे माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .यामुळे आता भात वारवणी करण्यासाठी पारंपारिक पद्धत अवलंबविण्यासाठी उडणारी तारांबळ यापासून मुक्ती मिळणार आहे. त्याचप्रमाणे बार्दे बागांमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या शेंगा भरण्यासाठी निर्माण होणाऱया कटकटी यापासून मुक्ती मिळणार असून हळद पोलीस करण्याचे नवीन तंत्र उभारून हळदी उत्पादनासाठी वेगवेगळय़ा प्रकारची सुविधा निर्माण होणार आहे.
याबाबतची माहिती अशी की ब्रह्मकरमळी या ठिकाणी ओंकार कृषी यंत्र गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. आतापर्यंत वेगवेगळय़ा प्रकारची यंत्रे या आस्थापनाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहेत .मात्र शेतकरी बांधव व वेगवेगळय़ा स्तरावर ग्राहकांची गरज ओळखून नवीन तीन मशीनची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात भात वाळवणी यंत्र ,शेंगा मळणी यंत्र व हळद पॉलिश यंत्र यंत्राचा यामध्ये खास समावेश आहे .
यासंदर्भात उद्घाटन समारंभ नुकताच ब्रह्मकरमळी याठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्याचे माजी उपसभापती नरहरी हळदणकर उद्योजक प्रसाद उर्फ पुरुषोत्तम खाडीलकर समाज कार्यकर्ते मिलिंद गाडगीळ माजी सरपंच वामनराव देसाई व या आस्थापनाचे मालक संदीप केळकर यांची खासकरून उपस्थिती होती .यावेळी बोलताना नरहरी हळदणकर यांनी सत्तरीसारख्या ग्रामीण भागामध्ये निर्मिती करण्यासाठी अनेक प्रकारच्या असलेल्या आव्हानाला समर्थपणे तोंड देत नवीन यंत्रे तयार करण्याचे केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले. येणाऱया काळात या आस्थापनाच्या माध्यमातून ग्राहकांना हवी असलेली यंत्रे तयार करण्याचे सामर्थ्य लाभो अशा प्रकारची शुभेच्छा दिली.
भात वारवणी यंत्र
सध्या भाताचे उत्पादन कमी असले तरीसुद्धा गोवा राज्याचे वेगवेगळे भागात आजही मोठय़ा प्रमाणात भाताचे उत्पादन होत आहे .सध्या मनुष्यबळ मिळणे कठीण होत आहे. यामुळे भाताची वाळवणी करताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .यामुळे या नवीन मशीनची निर्मिती करण्यात आलेली आहे. यासंदर्भात अस्थापनाचे मालक संदीप केळकर, त्याचे पुत्र संदेश, सर्वेश यांनी दिलेल्या माहितीनुसार 50 किलो भाताची वारवणी एका तासामध्ये होऊ शकते असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सदर मशीन अत्यंत कौशल्य वापरून तयार करण्यात आले असून ते भात उत्पादनासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे.
शेंगा मळणी यंत्र
शेंगा मळणी यंत्राबाबत अधिक माहिती देताना असता त्यांनी सांगितले की गोवा राज्याच्या बार्देश सारख्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात शेंगा उत्पादन होत असते. मात्र त्याची मळणी करताना अनेक प्रकारच्या कटकटी सहन करावे लागत असतात. यासाठी ग्राहकांच्या सोबत संवाद साधून शेंगा मळणी यंत्र तयार करण्यात आलेले आहे. हे यंत्र त्यांना अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे या यंत्राची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यात आलेली आहे. त्यानुसारच याची निर्मिती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हळद पाँलिश मशीन
यंदा कृषी खात्यातर्फे प्रयत्न करण्यात आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात राज्यात हळदीची लागवड करण्यात आलेली आहे .हळदीला बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मात्र त्याचे पोलिशींग करणे अत्यंत गरजेचे आहे. याचा सारासार विचार करून हळद पॉलिश मशीन तयार करण्यात आलेली आहे. सदर मशीनच्या माध्यमातून प्रतितास 20 किलो हळदीच्या पोलिशींग होऊ शकते असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले .या तिन्ही यंत्रांची किंमत वाजवी स्वरुपाची असून सर्वसामान्यांना परवडणारे हे मशीन असल्यामुळे या मशीनला वाढती मागणी मिळू शकते अशा प्रकारचा दावा आस्थापनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या आस्थापनांची अनेक स्वरूपाची मशिने गोवा केरळ व गुजरात या भागांमध्ये नेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी देसाई यांनी केले.