पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा दिली आहे. आयात केल्या जाणाऱया जास्तीत जास्त वस्तू देशातल्या देशात बनाव्यात, हा त्यामागील हेतू. ऍपल या जगद्विख्यात कंपनीने भारतात चेन्नई येथे प्रकल्प सुरू केला आणि तेथे आयफोन-11 चे उत्पादन सुरू केले आहे. देशात प्रथमच ऍपलने टॉप ऑफ द लाइन मॉडेल्स बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी गेल्यावषी या कंपनीने आयफोन-एक्सआरची जुळणी करण्याचे काम भारतात सुरू केले होते. 2016 साली ऍपलने बेंगळूरमध्ये आयफोन-एसीचे उत्पादन सुरू केले. लवकरच तेथे आयफोन-एसई 2020चे उत्पादन सुरू केले जाणार आहे. फॉक्सकॉन ही कंपनी ऍपलची प्रमुख पुरवठादार आहे. ती भारतात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून, आयफोन मॉडेल्सच्या जुळणीची क्षमता वाढवणार आहे. मेक इन इंडियाच्या दृष्टिकोनातून काही पावले पडत असतील, तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे.
भारत जगातील दुसऱया क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ आहे. तसेच मोबाईल उत्पादन करण्यात भारताचा जगात दुसरा नंबर आहे. मात्र मोबाईलबरोबरच एअर कंडिशनर्स, ध्वनी सामग्री, रेफ्रिजरेटर्स, टेलिव्हिजन संच आणि धुलाई यंत्रांचे देशांतर्गत उत्पादन नजीकच्या भविष्यकाळात वाढेल, असा अंदाज आहे. 2025 पर्यंत या वस्तूंचे उत्पादन सध्या जे 76 हजार कोटी रुपये इतके आहे, ते दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या तैवानी कंपन्या भारतात ऍपलसाठी फोन बनवतात. तसेच पेगाट्रॉन ही आयफोनची कंपनी लवकरच येथे उत्पादन सुरू करणार आहे. लाव्हा, पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्स, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आणि सोजो मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस या भारतातील स्मार्टफोनमधील बडय़ा उत्पादक कंपन्या. गेल्या दहा वर्षांत भारतातील मोबाईलचे उत्पादन वाढत आहे. पण मुख्यतः इथे जुळणीचेच म्हणजे असेंब्लींगचे काम चालते. अर्थात फोन चार्जर्स आणि इतर ऍक्सेसरीजही इथे बनतात. चीनच्या मुजोरीपणामुळे अनेक देशांना त्याच्यावरील अवलंबन कमी करायची इच्छा आहे. अशा देशातील इलेक्ट्रॉनिक व मोबाईल कंपन्या भारताकडे वळण्याची शक्मयता आहे. अर्थात केवळ चीनच नव्हे, तर या क्षेत्रात व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि तैवानशी भारताची स्पर्धा आहे. जगामधील मोबाईलच्या वापरात भारताचे नाव अग्रभागी दिसेल. परंतु मोबाईलच्या उत्पादनात भारत आजवर तरी मागेच राहिला आहे. काही वर्षांपूर्वी मॅक्स मोबाईल कम्युनिकेशन कंपनी मोबाईल ऍक्सेसरीजकडून मोबाईल उत्पादनाकडे वळली. परदेशांतून मोबाईल भारतात येतात, तेव्हा वेगवेगळय़ा कारणांमुळे त्यांची किंमत फुगत जाते. भारतातच उत्पादन झाल्यामुळे इतर खर्च कमी होऊन, मोबाईलची किंमत कमी होईल या हिशेबाने कंपनीने गुरगाव येथे उत्पादन सुरू केले. दोन वर्षांपूर्वी नवी दिल्लीत सॅमसंग कंपनीच्या जगातील सर्वात मोठय़ा कारखान्याचे उत्पादन नोयडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या उपस्थितीत झाले. सॅमसंगच्या या कारखान्यात मोबाईलबरोबरच फ्रिज, टीव्ही व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन सुरू झाले. सॅमसंगने 1990च्या दशकात भारतात पहिले इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र सुरू केले. 1997 पासून तेथे टीव्ही बनू लागले आणि 2005 पसून मोबाईल. अलीकडे कंपनीने तेथे सुमारे पाच हजार कोटी रु.ची गुंतवणूक केली असून, त्यामुळे तेथे जे सहा कोटी मोबाईल तयार होत होते, त्याची संख्या आता बारा कोटींवर गेली आहे. यामुळे जवळपास 70 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
भारत आता जगातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. आतापर्यंत देशात 300 मोबाईल कारखाने सुरू झाले आहेत. 2014 मध्ये देशात सहा कोटी स्मार्टफोन्स तयार करण्यात आले होते. तेव्हा केवळ दोन मोबाईल कारखाने भारतात होते आणि मोबाईल उत्पादनाची उलाढाल तीन अब्ज डॉलर्स इतकी होती. हाच आकडा आता तीस अब्ज डॉलर्सच्या घरात जाऊन पोहोचला आहे. शाओमीचे 99 टक्के फोन भारतात तयार होत आहेत. कंपनीने पाच वर्षांपूर्वी येथे मोबाईल कारखाना उभारला. आता भारतात तयार होणाऱया फोनमधील 65 टक्के भाग स्थानिक पातळीवरच विकत घेतले जात आहेत. लाव्हा या कंपनीने चीनमधील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आणि ती भारतात आली. भारतात 800 कोटी रु.ची गुंतवणूक करण्याचा निर्णय तिने घेतला. उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात लाव्हाचे चीनमध्ये 650 कर्मचारी होते. हे काम त्यांनी भारतात हलवले. त्यामुळे या कंपन्यांना यथायोग्य पायाभूत सुविधा पुरवून पोषक वातावरण निर्माण करणे, हे सरकारचे काम आहे.
– हेमंत देसाई