ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सोशल मीडियावर प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली जात आहे. यावर रतन टाटा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावर माझ्याबद्दल ज्या भावना आणि मत व्यक्त केले त्याबद्दल खूप आभारी आहे. पण आपण सर्वांनी हे कॅम्पेन थांबवावे अशी माझी नम्र विनंती आहे, असे रतन टाटा यांनी ट्वीट करून म्हटले आहे.
सोशल मीडिया साइट ट्वीटरवर तरुणांना प्रेरणा देण्यासाठी #BharatRatnaForRatanTata या हॅशटॅगने कॅम्पेन सुरू करण्यात आले. हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. ‘मी भाग्यवान आहे, मी भारतीय आहे. देशाच्या विकासात आणि प्रगतीत योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे’, असे रतन टाटा म्हणाले.
उद्योगपती रतन टाटा हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत, असे एका युजरने म्हटले आहे. तर रतन टाटा हे ‘Real Hero Of india’ आहेत. आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, असे देखील आणखी एका युजरने म्हटले आहे.