प्रतिनिधी / सांगली
जगात व देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने वाढत आहे. कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या संकटामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यातील जनतेने घरातच राहून साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्बल, वंचित घटकांना सन्मानाने जगण्यासाठी राष्ट्र उभारणीत दिलेले कृतिशील योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्याचे, त्यांच्या चरित्राचे , त्यांच्या विचारांचे या दिवशी स्मरण करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करावा. त्यांची जयंती जनतेने घरातच थांबून साजरी करून त्यांना अभिवादन करावे. आणि कोरोनाविरूध्दच्या लढाईतील एकजूट दाखवावी, असेे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे