नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दुष्काळ आणि अस्थिरतेशी झुंजणाऱया अफगाणिस्तान या देशाला भारताने आणखी साहाय्य पाठविले आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून हे साहाय्य देण्यात येत आहे. नव्याने पाठविलेल्या सामग्रीत दोन टन जीवबचाव औषधांचा समावेश आहे. ही औषधे काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या सुपूर्द करण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाने वक्तव्याद्वारे दिली.
भारताने गेल्या काही महिन्यांमध्ये मानवीय सहाय्याच्या अशा दोन खेपा अफगाणिस्तानला पाठविल्या आहेत. व्यापक सहाय्य योजनेचा भाग म्हणून ही औषधे देण्यात आली. अफगाणिस्तानला साहाय्य करण्याचे वचन भारताने दिले असून त्याची पूर्तता वेळोवेळी आवश्यकतेनुसार करण्यात येत आहे.
लसीच्या मात्राही पुरविल्या
काही दिवसांपूर्वी भारताने या देशाला कोरोना लसीच्या 5 लाख मात्राही दिल्या आहेत. तसेच 1.6 टन औषधे पाठविली आहेत. भारत हे साहाय्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून करत आहे. आगामी काही आठवडय़ांमध्ये भारत या देशाला अन्नधान्ये आणि आणखी औषधांचे साहाय्य पाठविणार आहे. तसेच कोरोनाची लसही आणखी प्रमाणात दिली जाईल. अन्न धान्यांचे साहाय्य पाठविण्यासाठी भारताला पाकिस्तानच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानशी या संबंधात बोलणी सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.