ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
‘पेगासस’कडून होणाऱ्या हेरगिरीच्या मुद्द्यावरून भारतीय संसदेत दोन दिवस गदारोळ सुरू आहे. असे असतानाच पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. भारताकडून पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन हॅक केला जात आहे. लवकरच हा मुद्दा जागतिक स्तरावर उठवला जाईल, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राशी बोलताना चौधरी म्हणाले, पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन भारताकडून हॅक केला जात आहे. आम्ही त्यासंबंधी माहिती गोळा करत आहोत. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर हा मुद्दा जागतिक स्तरावर उठवला जाईल.
दरम्यान, इस्रायली कंपनीच्या ‘पेगासस’ सॉफ्टवेअरने भारतात जवळपास 300 मोबाईल नंबरची हेरगिरी केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासह प्रमुख राजकीय नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, 40 पत्रकार आणि काही अन्य लोकांचा समावेश आहे. या मुद्द्यावरूनच संसदेत दोन दिवस गदारोळ सुरू आहे.