नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे अनेक देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारताचा शेजारी देश मालदीवलाही मोठा फटका बसला आहे. मालदीवच्या मदतीसाठी भारत पुढे आला असून, सरकारने 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत केली आहे. याशिवाय भारत मालदीवच्या मदतीसाठी डॉक्टर आणि तज्ञांची टीमही पाठवणार आहे. तसेच तेथील 500 रुग्ण भारतात उपचारासाठी येणार आहेत.
भारताच्या आर्थिक मदतीनंतर मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी मोदी सरकारचे विशेष आभार मानले आहेत. देशाला मोठी आर्थिक गरज असताना भारत जिवलग मित्राप्रमाणे धावून आला आहे. पंतप्रधान मोदी सरकार आणि भारताच्या लोकांचे मनापासून आभार’ असे ट्विट सोलिह यांनी केले आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी देखील भारताचे आभार मानले आहेत.
भारताकडून आर्थिक मदतीची घोषणा मागील आठवडय़ात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री शाहिद यांच्यामध्ये झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये करण्यात आली होती. हे कर्ज परत करण्यासाठी मालदीवकडे 10 वर्षांचा कालावधी आहे. भारताचे हे पाऊल चीनशी देखील जोडले जात आहे. चीन मालदीवमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक वाढवत आहे. येथील परदेशी कर्जातील जवळपास 70 टक्के चीनचे कर्ज आहे. मालदीव हिंद महासागरातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मालदीवमधील चीनचे वर्चस्व कमी करणे भारतासाठी आवश्यक आहे.