ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताला पाकिस्तानशी मैत्री हवी होती. पण, पाकिस्तानने भारताची जमीन हस्तगत करण्यासाठी आणि अंतर्गत कलहांवरुन लक्ष हटविण्यासाठी शत्रुत्व घेतले. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीत झाले, ती परिस्थिती भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्तानचे हे दृष्टपणाचे रूप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. सुरुवातीलाच मोदींनी कारगिल विजय दिनाचे स्मरण केले. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्कराने विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झाले, ते भारत कधीही विसरू शकत नाही, असे सांगत मोदींनी शहिदांच्या शौर्याला अभिवादन केले.
मोदी म्हणाले, युद्ध फक्त सीमवेरच नाही तर देशांतर्गत देखील लढले जाते. मागील काही महिने आपण सर्वजन कोरोनाशी लढा देत आहोत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगले आहे. मृत्यूदरही कमी आहे. मात्र, कोरोना अजनही तितकाच घातक आहे, जितका सुरूवातीला होता. त्यामुळे चेहऱ्यावरील मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर हीच कोरोना लढाईतील महत्वाची शस्त्रे आहेत. त्याचा सर्वांनी वापर करून कोरोना लढाई जिंकू, असेही मोदी म्हणाले.