3 मुद्दय़ांवर राहणार भर
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
1 आगॅस्ट रोजी म्हणजेच आज संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्षत्व भारताकडे आले आहे. यादरम्यान सागरी सुरक्षा, शांतता प्रस्थापित करणे आणि दहशतवाद रोखण्यासंबंधी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भारत तयार आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ति यांनी 15 देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व भारताने स्वीकारण्यापूर्वी एक चित्रफितरुपी संदेश दिला आहे.
सुरक्षा परिषदेच्या कार्यक्रमांसंबंधी संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयात तिरुमूर्ति पत्रकार परिषदांना संबोधित करणार आहेत. सुरक्षा परिषदेचे सदस्य नसलेल्या देशांनाही परिषदेच्या कामकाजाचा तपशील त्यांच्याकडून उपलब्ध केला जाणार आहे. सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2021 रोजी सुरू झाला होता. ऑगस्ट महिन्यातील अध्यक्षत्व भारताकडे असणार आहे. तसेच पुढील वर्षी डिसेंबरमध्ये भारत पुन्हा परिषदेचे अध्यक्षत्व सांभाळणार आहे.
सागरी सुरक्षेला भारताचे सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षा परिषदेसाठी या मुद्दय़ावर समग्र स्वरुपात भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. भारत शांतिसैनिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या विषयावर लक्ष केंद्रीत करणार आहे. शांतिसैनिकांच्या विरोधात गुन्हे करणाऱया दोषींना कठोर शिक्षा व्हावी असा प्रयत्न राहणार आहे. दहशतवाद रोखण्याच्या प्रयत्नांवर भारत सातत्याने भर देत राहणार असल्याचे तिरुमूर्ति म्हणाले.
परिषदेच्या मागील 7 महिन्यांच्या कार्यकाळात भारताने विविध मुद्दय़ांवर मूल्यांना धरून तसेच दूरदर्शी भूमिका स्वीकारली आहे. जबाबदाऱयांचे पालन करण्यास भारत घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.