दुसऱया टी-20 सामन्यात भारत 49 धावांनी विजयी, मालिकेतील तिसरी व शेवटची टी-20 आज
वृत्तसंस्था /बर्मिंगहम
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सला सोडचिठ्ठी देण्याच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या रविंद्र जडेजाने त्या वादाचा आपल्या खेळावर मात्र परिणाम होऊ दिला नाही आणि त्याने फटकावलेल्या 29 चेंडूतील नाबाद 46 धावांच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात दमदार विजय संपादन केला. भारताने 20 षटकात 8 बाद 170 धावा केल्या. प्रत्य़ुत्तरात इंग्लंडला 17 षटकात सर्वबाद 121 धावांवर समाधान मानावे लागले.
भारतीय संघ एकवेळ 5 बाद 89 असा अडचणीत होता. मात्र, त्यानंतर जडेजाने चौफेर धुलाई केली. विराट कोहलीचा (1) बॅड पॅच या सामन्यातही कायम राहिला.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ विजयपथावर दिसून आला नाही. मोईन अलीने 35 तर डेव्हिड विलीने 33 धावा केल्या. भुवनेश्वरने 15 धावात 3 बळी घेतले तर बुमराह (2-10), चहल (2-10) यांनीही सातत्याने धक्के दिले. उभय संघातील तिसरी व शेवटची टी-20 लढत आज सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 8-170 (रविंद्र जडेजा नाबाद 46, पंत 26, रोहित 31. जॉर्डन 4-27, ग्लेसन 3-15). इंग्लंड ः 17 षटकात सर्वबाद 121 (मोईन अली 35, विली नाबाद 33. भुवनेश्वर 3-15, बुमराह 2-10, यजुवेंद्र चहल 2-10).
रोहितच्या नेतृत्वाखाली सलग चौथा मालिकाविजय
रोहितने पूर्ण वेळ नेतृत्व स्वीकारल्यानंतर भारताचा हा सलग चौथा मालिकाविजय ठरला. भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड (3-0), विंडीज (3-0), श्रीलंका (3-0) यांचा फडशा पाडला असून आता इंग्लंडविरुद्धही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.