निर्णायक सामन्यात कांगारूंवर 7 गडय़ांनी मात, रोहितचे शतक, कोहलीचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ बेंगळूर
उपकर्णधार रोहित शर्माचे शानदार शतक, कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या उपयुक्त 44 धावा व शमीचे चार बळी यांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियावर 7 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. स्मिथचे शतक मात्र वाया गेले. 29 वे शतक नोंदवणाऱया रोहित शर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी करणाऱया ऑस्ट्रेलियाला भारताने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 286 धावांवर रोखल्यानंतर भारताने 47.3 षटकांत 3 बाद 289 धावा जमवित विजय साकार केला. गेल्या वर्षी मार्चमध्ये मायभूमीतच भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. येथील मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 10 गडय़ांनी दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. पण त्याचा अजिबात परिणाम होऊ न देता राजकोट व बेंगळूरमधील सामने मोठय़ा फरकाने जिंकून त्या मालिकापराभवाची परतफेड केली.
रोहित व केएल राहुल यांनी 69 धावांचा फ्लाईंट स्टार्ट दिल्यानंतर रोहित व कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 137 धावांची भागीदारी करून भारताचा विजय सोपा केला. रोहितने 128 चेंडूत 8 चौकार, 6 षटकारांची आतषबाजी केली. तो बाद झाल्यानंतर कोहलीने संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करून दिली. कोहलीने 91 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 89 धावा काढल्या. 13 धावांची गरज असताना तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मनीष पांडेच्या साथीने विजयाचे सोपस्कार 48 व्या षटकात पूर्ण केले. श्रेयस 44 तर मनीष 8 धावांवर नाबाद राहिले. श्रेयसने 35 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार, 1 षटकार मारला. राहुलने 27 चेंडूत 19 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवुड, ऍगर व झाम्पा यांनी एकेक बळी मिळविले. रोहित शर्माने येथील खेळीत वनडेमधील 9000 धावांचा टप्पा पूर्ण केला तर कोहलीने कर्णधार या नात्याने सर्वात जलद 5000 धावांचा टप्पा गाठला.
स्मिथचे नववे शतक
तत्पूर्वी, तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत झाल्याने या तिसऱया सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले होते. स्मिथने एका बाजूने किल्ला लढविला, मात्र त्याला लाबुशाने वगळता इतरांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. स्मिथने 132 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार, 1 षटकार मारला तर लाबुशानेने 64 चेंडूत 5 चौकार मारले. भारतातर्फे मोहम्मद शमी सर्वात भेदक व यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 63 धावांत 4 बळी टिपले. त्याने ‘डेथ ओव्हर्स’मध्ये शानदार गोलंदाजी करीत तीन मिळविले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दहा षटकांत 5 गडय़ांच्या मोबदल्यात केवळ 63 धावाच जमविता आल्या.
ऑस्ट्रेलियाने या मालिकेत सलग तिसऱयांदा नाणेफेक जिंकली. पण यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. राजकोटमध्ये खेळलेला संघच कर्णधार विराट कोहलीने या सामन्यातही कायम ठेवला. ऋषभ पंत उपलब्ध होता. तरी त्याला संघाबाहेरच ठेवण्यात आले आणि राहुलवर सलग दुसऱया सामन्यात यष्टिरक्षण करण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियाने फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (3) व कर्णधार ऍरोन फिंच (19) लवकर गमावले. शमीने प्रारंभी ऑफस्टंपचा रोख धरला होता. त्यामुळे एका बाहेर जाणाऱया चेंडूवर वॉर्नर राहुलकरवी झेलबाद झाला. नंतर स्मिथच्या चुकीमुळे फिंच धावचीत झाला. धाव घेण्यासाठी त्याने फिंच कॉल केले. पण ऐनवेळी निर्णय बदलला आणि तो माघारी फिरला. त्यामुळे फिंचला वेळेत माघारी परतणे जमले नाही. तंबूत परतताना तो स्मिथवर बराच रागावल्याचे दिसत होते. पहिल्या पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने 2 बाद 56 धावा जमविल्या होत्या. स्मिथ व लाबुशाने यांनी सावध फलंदाजी करीत डावाला आकार दिला आणि दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 127 धावांची भागीदारी केली. मागील सामन्यातही या जोडीने 96 धावांची भागीदारी केली होती. दोघांनी नंतर अर्धशतके पूर्ण केली. पण अर्धशतकानंतर लाबुशाने फार वेळ टिकला नाही. कव्हरमध्ये कोहलीने सूर मारून अप्रतिम झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. जडेजाचा हा पहिला बळी होता.
जडेजाने याच षटकात दुसरा बळी मिळविताना स्टार्कला डीप मिडविकेट क्षेत्रात चहलकरवी झेलबाद केले. 32 व्या षटकात ऑस्ट्रेलियाची स्थिती 4 बाद 172 अशी झाली होती. आधीच्या सामन्यात दोन धावांनी शतक हुकलेल्या स्मिथने नंतर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू टोलवून एक धाव घेत नववे शतक पूर्ण केले. गेल्या तीन वर्षातील त्याचे हे पहिले शतक आहे. पण त्याला इतरांकडून साथ न मिळाल्याने संघाला 300 ची मजल मारता आला नाही. 46 व्या षटकापासून त्याने आक्रमक फटकेबाजी सुरू केली आणि सैनीला एक षटकारही ठोकला व नंतर चौकारही वसुल केला. बुमराहलाही त्याने लागोपाठ दोन चौकार लगावले. मात्र शेवटच्या तीन षटकात शमी व बुमराह यांनी अचूक मारा करीत ऑस्ट्रेलियाला तीनशेच्या आत रोखण्यात यश आले. ऍलेक्स कॅरेने स्मिथला थोडीफार साथ दिल्याने पाचव्या गडय़ासाठी त्याने 58 धावांची भागीदारी केली. कॅरेने 36 चेंडूत 35 धावा काढल्या. ऍस्टन ऍगर 11 व हॅझलवूड एका धावेवर नाबाद राहिले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 9 बाद 286 : वॉर्नर 3, फिंच 19 (26 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), स्मिथ 131 (132 चेंडूत 14 चौकार, 1 षटकार), लाबुशाने 54 (64 चेंडूत 5 चौकार), स्टार्क 0, कॅरे 35 (36 चेंडूत 6 चौकार), टर्नर 4, ऍगर नाबाद 11 (13 चेंडू), कमिन्स 0, झाम्पा 1, हॅझलवुड नाबाद 1, अवांतर 27. गोलंदाजी : शमी 4-63, जडेजा 2-44, कुलदीप यादव 1-62, सैनी 1-65, बुमराह 0-38.
भारत : 47.3 षटकांत 3 बाद 289 : रोहित शर्मा 119 (128 चेंडूत 8 चौकार, 6 षटकार), राहुल 19 (27 चेंडूत 2 चौकार), कोहली 89 (91 चेंडूत 8 चौकार), श्रेयस अय्यर नाबाद 44 (35 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे नाबाद 8 (4 चेंडूत 2 चौकार), अवांतर 10. गोलंदाजी : हॅझलवुड 1-55, ऍगर 1-38, झाम्पा 1-44, कमिन्स 0-64 (7 षटके), स्टार्क 0-66 (9), लाबुशाने 0-11 (1).