ऑनलाईन टीम/तरुण भारत
रविवारी झालेल्या आयसीसी टी -20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. हा सामना झाल्यानंतर पंजाबमधील दोन विद्यालयांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचं समोर आलंय. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सामन्यानंतर त्यांच्या वसतिगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांवर केलेल्या या हल्ल्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. तर, खरारमधील रयत बहराट विद्यापीठातही असाच प्रकार घडला आहे. असा दावा जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी केला आहे.
दरम्यान, पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की, भारताचा वर्ल्ड कपमध्ये पराभव होताच त्यांच्यावर हल्ला कऱण्यात आला. काश्मिरी विद्यार्थ्यांनी म्हटलं की, आम्ही इथे मॅच बघत होतो. तेव्हा युपीवाले आमच्यावर हल्ला करायला लागले. आम्ही इथं शिकण्यासाठी आलो आणि आम्हीही हिंदुस्थानी आहे. तुम्ही पाहू शकता की आमच्यासोबत कसे वागतायत? आम्ही भारतीय नाही का? मोदीजी काय बोलतायत? असे प्रश्नही काश्मिरी विद्यार्थ्यांनी विचारले.