ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना या जागतिक महामारीमुळे 50 हून अधिक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे भारताच्या विकासदरातही यंदा घट होऊन तो 2.8 टक्क्यांवर येईल, असे जागतिक बँकेने आज सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक बँकेने आज दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार, कोरोनाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे सन 2019-20 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्के इतका राहील. तर 2020-21 मध्ये लॉकडाऊनमुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होऊन विकासदर 2.8 टक्केच राहील. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था 5 टक्के विकासदर गाठू शकेल.
भविष्यात येणारी आर्थिक मंदी कमी करण्यासाठी भारताने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला पाहिजे. त्यांनंतर रोजगार निर्मितीवर भर देऊन पुरेसा धान्यसाठा उपलब्ध केला पाहिजे, असेही या अहवालात म्हटले आहे.