बार्कलेज फर्मच्या अहवालातून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनची ब्रोकरेज संस्था बार्कलेजने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या विकासदराच्या अंदाजामध्ये 0.82 टक्क्यांची कपात केली आहे. बार्कलेज यांनी आपल्या नवीन अंदाजामध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे आर्थिक विकासाची गती मंदावत जाणार असून यामुळे भारताचा विकास दर हा 9.2 टक्क्यांवर राहणार असल्याचे मत नोंदवले आहे. बार्कलेजचे भारतामधील प्रमुख अर्थतज्ञ राहूल बाजोरिया यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती संथ राहिल्याने व अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू केल्याच्या कारणास्तव विकासदरात घट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील महिन्यामध्ये विविध समीक्षकांनी मांडलेले अंदाज सादर केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आयआरबी)ने रियल जीडीपीमध्ये 10.5 टक्क्यांची वाढ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. समीक्षकांनी 8.5 टक्के ते 10 टक्क्यांवर हा वाढीचा दर राहणार असल्याचे म्हटले आहे.
लॉकडाऊनचा सर्वाधिक प्रभाव
राहुल बाजोरिया यांनी म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये आता कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी लॉकडाऊनमधील बंदमुळे अर्थव्यवस्थेवर मात्र खूप नकारात्मक परिणाम होत आहे.