वृत्तसंस्था/ कोलंबो
कर्णधार शिखर धवन व इशान किशन यांची अर्धशतके, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी आणि स्पिनर्सचा भेदक मारा यांच्या बळावर भारताने पहिल्या वनडेत यजमान लंकेचा 7 गडय़ांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली.
चमिका करूणारत्नेच्या नाबाद 43 धावांच्या खेळीने यजमान लंकेने रविवारी येथे पहिल्या वनडे सामन्यात 50 षटकांत 9 बाद 262 धावा जमविल्या. भारतातर्फे कुलदीप यादव तसेच दीपक चहर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताने 36.4 षटकांत 3 बाद 263 धावा जमवित सहज विजय मिळविले. धवनने 95 चेंडूत नाबाद 86, इशान किशनने 42 चेंडूत 59, पृथ्वी शॉने 24 चेंडूत 43, मनीष पांडेने 40 चेंडूत 26, सूर्यकुमारने 20 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. 23 जुलै रोजी दुसरा सामना होणार आहे.
या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविले. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने डावातील 17 व्या षटकांत लंकेच्या दोन फलंदाजांना बाद केल्याने यजमान संघावर थोडे दडपण आले. लंकेच्या सर्व फलंदाजांनी सावध फलंदाजी करत धावसंख्येला बऱयापैकी आकार दिला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या चमिका करूणारत्नेने भुवनेश्वरकुमारच्या शेवटच्या काही षटकांमध्ये दोन उत्तंgग षटकार मारल्याने लंकेला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. भुवनेश्वरकुमारला या सामन्यात एकही बळी मिळविता आला नाही. त्याने 9 षटकांत 63 धावा दिल्या. या सामन्यात भारताने तीन फिरकी गोलंदाजांना खेळविले. कुलदीप यादव चेंडूला चांगलीच उंची देत होता तर चहलचे चेंडू बरेच वळत होते. कृणाल पंडय़ाने मधल्या यष्टीच्या रोखाने अचूक मारा केला. या तीन फिरकी गोलंदाजांनी एकूण 98 डॉट बॉल्स टाकले.
लंकेच्या फलंदाजांनी डावाला अत्यंत सावध सुरूवात केली. सलामीच्या अविष्का फर्नांडो आणि भानुका यांनी 9.1 षटकांत 49 धावांची भागिदारी केली. चहलने ही जोडी फोडताना फर्नांडोला मनीष पांडेकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 1 षटकार, 2 चौकारांसह 33 धावा जमविल्या. भानुकाने 44 चेंडूत 3 चौकारांसह 27 तर राजपक्षेने 22 चेंडूत 2 षटकार, 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या.
कुलदीप यादवने राजपक्षे आणि भानुका यांना आपल्या एकाच षटकातील पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर बाद केले. अनुभवी धनंजय डिसिल्वाने 27 चेंडूत 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. कृणाल पंडय़ाने त्याला भुवनेश्वरकुमार करवी झेलबाद केले.
असालंका आणि हसरंगा या लंकेच्या जोडीने एकेरी आणि दुहेरी धावांवर भर देत धावफलक हालता ठेवताना पाचव्या गडय़ासाठी 49 धावांची भर घातली. चहरने असालंकाला झेलबाद केले. त्याने 65 चेंडूत 1 चौकारांसह 38 तर हसरंगाने 50 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 39 धावा जमविल्या. शनाकाने 8 तसेच उदानाने 8 धावा जमविल्या. चमिराने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. करूणारत्ने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 43 धावांवर नाबाद राहिला. करूणारत्ने आणि चमिरा यांनी नवव्या गडय़ासाठी 40 धावांची भागिदारी केली. लंकेच्या डावात 7 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे दीपक चहर, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 तसेच कृणाल पंडय़ा आणि हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.