ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर (GDP) 9.2 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील 70 टक्के आर्थिक व्यवहार, उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक ठप्प आहे. लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात उठवण्यात आले असले तरी बाजारात मागणी कमी असल्याने उद्योगधंद्यांच्या कर्जाची थकबाकी वाढू शकते. मार्च 2021 पर्यंत नोंदणीकृत बॅंकांचे एकूण ‘नॉन-परफॉर्मिंग लोन-टू-ॲसेट रेशो’ 12.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. मार्च 2020 मध्ये तो 8.5 टक्के होता.
जागतिक बँकेने नुकत्याच झालेल्या साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस पॉईंट अहवालात म्हटले आहे की, कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. राज्य सरकारांची एकूण वित्तीय तूट 4.5 ते 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल, तरीही चालू आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारची मिळून एकूण तूट 12 टक्क्यांहून अधिक असेल. मात्र, पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये देशाचा GDP 5.4 टक्क्यांनी वाढेल, असेही या अहवालात म्हटले आहे.