इंग्लंड-ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ पराभवांमुळे भारताचा मार्ग खडतर
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
सातत्याचा अभाव असलेल्या भारतीय महिला संघाची आज (मंगळवार दि. 22) बांगलादेशविरुद्ध महत्वाची लढत होत असून भारताला कोणत्याही परिस्थितीत येथे विजय संपादन करणे क्रमप्राप्त असेल. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात 3 पराभव पत्करल्यानंतर भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करता येईल. आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता खेळवली जाणार आहे.
यंदाच्या विश्वचषक मोहिमेत भारताने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ पराभव पत्करले असून याचमुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा संघाचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 278 धावांचे आव्हान दिल्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. गोलंदाजांच्या खराब फॉर्मचा त्यावेळी संघाला फटका बसला होता. गोलंदाजीतील आणखी एक पर्याय असलेल्या दीप्ती शर्माला वगळत शफाली वर्माला संघात स्थान देऊन फलंदाजी बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न त्यावेळी फारसा फळला नसल्याचे स्पष्ट झाले.
हरमनप्रीत कौरने आपला फॉर्म अधोरेखित केला असला तरी तिला अद्याप ऑफस्पिनर म्हणून संधी देण्यात आलेली नाही. आजच्या महत्त्वाच्या लढतीत पुन्हा शफालीला संधी दिली जाणार का आणि यास्तिका-स्मृती हेच सलामीला उतरणार का, हे नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. हरमनप्रीतला सूर सापडला, ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीतील दिलासा देणारी बाब ठरली. आजच्या लढतीत स्मृतीची बॅट तळपणे देखील भारतासाठी तितकेच महत्त्वाचे असेल.
दुसरीकडे, बांगलादेशचा संघ यंदा काही आघाडय़ांवर उत्तम खेळत असला तरी त्यांना बरेच सामने निसटत्या फरकाने गमवावे लागले आहेत. यंदा 5 सामन्यात 4 पराभव व 1 विजय अशी त्यांची कामगिरी राहिली आहे. मागील साखळी सामन्यात त्यांना विंडीजविरुद्ध 141 धावांचे सोपे आव्हान पेलवले नव्हते.
संभाव्य संघ
बांगलादेश ः निगार सुलताना (कर्णधार), सलमा खातून, रुमाना अहमद, फरगाना हक, जहानरा आलम, शमिमा सुलताना, फहिमा खातून, रितू मोनी, मुर्शिदा खातून, नहिदा अक्तर, शर्मिन अख्तेर, लता मोंडल, सोभना मोस्तेरी, फरिहा त्रिस्ना, सुरैया अझमिन, संजिदा अक्तेर मेघला.
भारत ः मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकुर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.
कोट्स
सलग पराभव पचवावे लागले असले तरी बांगलादेशविरुद्ध आम्ही सहज विजय संपादन करु, असा विश्वास वाटतो. या लढतीत धावसरासरीपेक्षा विजय संपादन करणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल. बांगलादेशचा संघ सुधारणेच्या मार्गावर असल्याने आम्हाला सर्व आघाडय़ांवर सरस कामगिरी साकारावी लागेल.
-भारताची अष्टपैलू स्नेह राणा
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी आम्हाला फारसे वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही बऱयाच नियमितपणे खेळत आहोत. आमच्यासाठी प्रत्येक लढत ही मोठी संधी असते आणि आजची भारताविरुद्धची लढतही याला अपवाद नसेल.
-बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना.