अग्रस्थानी पोहोचणाऱया इंग्लंडला डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठण्याची आशा
वृत्तसंस्था/ दुबई
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत झालेल्या मोठय़ा पराभवानंतर आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे तर इंग्लंडने पहिले स्थान मिळवित अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. न्यूझीलंडने याआधीच अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
या वर्षीच जूनमध्ये अंतिम लढत लॉर्ड्सवर होणार असून न्यूझीलंडची आता कोणतीच मालिका राहिलेली नाही. त्यांनी आपले 70 टक्के सामने जिंकत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. मंगळवारच्या विजयानंतर इंग्लंडने 70.2 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. या मालिकेतील अद्याप तीन सामने बाकी असून या मालिकेत त्यांनी भारतावर 3-1, 3-0 किंवा 4-0 असा विजय मिळविला तरच त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार असल्याचे आयसीसीने निवेदनात सांगितले आहे.
गेल्या महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून डब्ल्यूटीसीमध्ये पहिले स्थान मिळविले होते. पण आता त्यांची चौथ्या स्थानावर घसरण झाली असून 68.3 अशी त्यांची विजयाची टक्केवारीही घसरली आहे. भारताला डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीनपैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर ऑस्ट्रेलियाचे भवितव्यही अवलंबून आहे. भारत-इंग्लंड मालिका बरोबरीत राहिली किंवा इंग्लंडने 1-0, 2-1 किंवा 2-0 असा मालिकाविजय मिळविला तर ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, असे आयसीसीने भारताची पहिली कसोटी झाल्यानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकने मायदेशात द.आफ्रिकेविरुद्ध झालेली मालिका 2-0 अशा फरकाने जिंकल्यानंतर 43.3 विजयाच्या टक्केवारीसह त्यांना पाचवे स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेची मात्र सहाव्या स्थानावर घसरण झाली असून त्यांची टक्केवारी 30.0 आहे. विंडीज 23.8 टक्केवारीसह सातव्या तर बांगलादेश आठव्या स्थानावर असून त्यांना अजून एकही गुण मिळविता आलेला नाही. विंडीजने नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशवर ऐतिहासिक विजय मिळविला होता.
विश्व कसोटी चॅम्पियनशिप ताजा गुणतक्ता (पहिले चार संघ)
संघ टक्केवारी गुण मालिका विजय हार ड्रॉ
इंग्लंड 70.2 442 6ङ 11 4 3
न्यूझीलंड 70.0 420 5 7 4 0
ऑस्ट्रेलिया 69.2 332 4 8 4 2
भारत 68.3 430 6ङ 9 4 1.