आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : ड्रग फ्लिकर हरमनप्रीत सिंगचे दोन गोल, उपांत्य फेरीकडे वाटचाल
वृत्तसंस्था/ ढाका
उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर भारताने येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील तिसऱया सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. भारताचा हा सलग दुसरा विजय असून उपांत्य फेरीतील स्थानही जवळपास निश्चित झाले आहे.
हरमनप्रीतने 8 व 53 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर्सवर गोल नोंदवले तर आकाशदीप सिंगने 42 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. त्याचा हा या स्पर्धेतील दुसरा गोल आहे. पाकचा एकमेव गोल 45 व्या मिनिटाला जुनैद मंझूरने नोंदवला. भारताने याआधीच्या सामन्यात बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडविला होता. पाकला मात्र अजून एकही विजय नोंदवता आलेला नाही. जपानविरुद्धचा पहिला सामना त्यांनी अनिर्णीत राखला होता. भारताने मात्र कोरियाविरुद्धचा पहिला सामना 2-2 असा बरोबरीत सोडविला होता. भारताने 3 सामन्यातून 7 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांचा पुढील राऊंडरॉबिन सामना जपानविरुद्ध रविवारी होणार आहे. या स्पर्धेत एकूण पाच संघांनी भाग घेतला असून पाकने दोन सामन्यांतून 1 गुण मिळविला आहे.
पहिल्या दोन सत्रात भारताने पझेशनच्या बाबतीत पाकवर पूर्ण वर्चस्व राखले होते तर पाकला बचाव करण्यावर भर द्यावा लागला. पण हरमनप्रीतचा एक गोल वगळता पाकने उत्तम बचाव केला. या दोन सत्रात पाकच्या हद्दीतच जास्त वेळ खेळ चालला होता. भारताने आक्रमक खेळ करीत काही संधी मिळविल्या. पण पाकचा गोलरक्षक मझर अब्बासने अप्रतिम बचाव करीत भारताला यश मिळू दिले नाही. आठव्या मिनिटाला भारताला पहिले यश हरमनप्रीतने मिळवून दिले. भारताला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर त्याने गोलरक्षकाच्या डाव्या बाजूला चेंडू फटकावत हा गोल केला. चार मिनिटानंतर कर्णधार मनप्रीत सिंगने सर्कलच्या बाहेरून डिफ्लेक्ट केलेला चेंडूही दक्ष असलेल्या अब्बासने अचूक अडविला. दुसऱया सत्रातही भारताने वर्चस्व कायम ठेवले. पण पाकने अप्रतिम बचाव करीत भारताचे काही प्रयत्न वाया घालविले.
पाकची बचाव फळी उत्तम कामगिरी बजावत असताना त्यांची आघाडी फळी मात्र प्रभावहीन वाटत होती. त्यांना भारतीय गोलच्या दिशेने एकही फटका मारता आली नाही आणि पेनल्टी कॉर्नरही मिळविता आला नाही. 1-0 अशी आघाडी घेतलेल्या भारताने मध्यंतरानंतरही आक्रमण चालूच ठेवले आणि 42 व्या मिनिटाला त्यांना आणखी एकदा यशही मिळाले. डाव्या बगलेतून सुमितने केलेल्या ड्राईव्हला रिव्हर्स हिटवर आकाशदीपने चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. यानंतर मात्र पाकने आक्रमणाला सुरुवात केली आणि तिसरे सत्र संपण्याच्या 27 सेकंद आधी पहिला गोल नोंदवला. मंझूरने अब्दुल राणाच्या पासवर डाईव्ह मारत चेंडूला गोलच्या दिशेने डिफ्लेक्ट करीत हा गोल केला.
पहिली तीन सत्रे भारताच्या नियंत्रणात होती, तर शेवटच्या सत्रात पाकने वर्चस्व गाजवित भारतावर दडपण आणले होते. यावेळी दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमणे केली. गोल नोंदवल्यानंतर पाकचा उत्साह दुणावला आणि 47 व्या मिनिटाला त्यांनी या पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारताने रेफरलची मागणी केल्यानंतर पंचांनी तो फेटाळून लावला. तरीही पाकने आशा सोडली नाही आणि आपल्या चढाया आणखी तेज करीत लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. मात्र युवा भारतीय गोलरक्षक सुरज करकेराने दोनदा अप्रतिम गोलरक्षण करीत भारताची आघाडी कायम राखली. या दरम्यान भारताने सामन्यातील दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि त्यावर हरमनप्रीतने ड्रगफ्लिक करीत वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवला. सामना संपण्यास तीन मिनिटे असताना भारताने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण वरुण कुमारचा फटका पाकिस्तानी गोलरक्षकाने थोपवल्याने भारताची ही संधी वाया गेली.