नवी दिल्ली : पेरूमधील लिमा येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या 12 नेमबाजांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली आहे.
सहा वैयक्तिक प्रकारांची बुधवारी पात्रता फेरी घेण्यात आली आणि गुरुवारी होणाऱया अंतिम फेरीत भारताला किमान चार सांघिक सुवर्णपदके मिळण्याची अपेक्षा आहे. रुद्रांक्ष पाटील, धनुष श्रीकांत, पार्थ माखिजा यांनी कनिष्ठ पुरुषांच्या 10 मी. एअर रायफलची अंतिम फेरी गाठताना पात्रता फेरीत अनुक्रमे 630.2. 629.6, 629.2 गुण नोंदवले. या तिघांनी या फेरीत दुसरे, तिसरे, चौथे स्थान मिळविले. अव्वल आठ क्रमांक मिळविणारे नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.कनिष्ठ महिला विभागात 10 मी. एअर रायफलमध्ये मेहुली घोषसह भारतीय त्रिकुटाने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. मेहुलीने 630.9 गुण घेत तिसरे तर रमिताने 629.8 व निशा कंवरने 629.1 गुण घेत चौथे व पाचवे स्थान मिळविले. कनिष्ठ पुरुष 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या नवीनने 584 गुण घेत अव्वल स्थान मिळविले. सरबजोत सिंगनेही तितकेच गुण नोंदवत अंतिम फेरी गाठली तर विजयवीर सिद्धूने 581 गुण नोंदवत चौथे स्थान मिळविले.